Kolhapur Heavy Rain Latest Update : पावसाचा जोर सोमवारी दिवसभरात ओसरला असला तरी पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील 83 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली असून, धोका पातळीकडे वाटचाली सुरू आहे. राधानगरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे काही तासात धरण भरले असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे धरणातून सुरू होणारा विसर्ग आणि ऑरेंज कलरच्या अंदाजानुसार मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास बुधवारी दुपारपर्यंत 45 फुटापर्यंत पोहोचेल, असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार प्रशासनाने शहरातील पूरग्रस्त भागातील आणि नदीकाठावरील गावातील नागरिकांना स्थलांतरित करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने कोल्हापुरात येऊन परत पूरस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, कोयना धरणातूनही 1050 क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पंचगंगेला आणखी फुगवठा येण्याची भीती आहे.दरम्यान आज सकाळी 10 वाजता बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. राजाराम बॅरेजजवळ 52 फूट पाण्याची पातळी गाठल्यावर आज (ता-25) संध्याकाळपर्यंत शहर आणि ग्रामीण वासियांनी स्थलांतरित होण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
गगनबावडा तालुक्यातील नागरिकांना सूचना
गगनबावडा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.सध्या कोल्हापूर येथील राजाराम बंधारा पाणी पातळी 40 फूट 5 इंच ओलांडून गेलेली आहे. इशारा पातळी 39 फुट आहे तर धोका पातळी 43 फुट आहे. राधानगरी धरण सुद्धा 90 टक्यांच्या पुढे भरलेले असून, स्वयंचलित दरवाज्या मधून कधीही पाणी बाहेर पडू शकते.तरी सन 2019 व सन 2021 च्या पुरात जे जे नागरिक घरांमध्ये पाणी आल्यामुळे स्थलांतरित झाले होते, त्यांनी त्याची तयारी करून ठेवावी व आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत.तसेच आपणासाठी निश्चित केलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याची तयारी ठेवावी.याबाबत कोणीही हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
चंदगड येथे पुराच्या पाण्यातून धोकादायक वाहतूक सुरु
कोवाड तालुका चंदगड येथे पुराच्या पाण्यातून धोकादायक वाहतूक सुरुच आहे. प्रवाशी आपला जीव धोक्यात घालून येथून प्रवास करत आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
कोल्हापूर शहर व ग्रामीण वासियांसाठी प्रशासनाच्या सूचना
2019 आणि 2021 च्या पुरात राजाराम बॅरेजजवळ 52 फूट पाण्याची पातळी गाठल्यावर बाधित झालेल्या प्रत्येकाने आज 25 जुलैच्या संध्याकाळपर्यंत स्थलांतरित होण्यासाठी तयार रहावे आणि प्रशासनाकडून सूचना मिळताच नियुक्त केलेल्या मदत शिबिरांसाठी/निवारागृहासाठी आपली घरे सोडावीत, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.