सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळेच जिल्हा पातळीवर मतदान; जिह्यातील शिक्षकांना मतदानासाठी यावे लागणार कोल्हापूरात
कृष्णात चौगले कोल्हापूर
‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 9 जुलै रोजी मतदान होत असून कोल्हापूर शहरात मतदानाची व्यवस्था केली आहे. वास्तविक तालुका पातळीवर मतदान केंद्र करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या मागणीनुसार आणि जिह्यातील एक माजी मंत्र्याच्या दबावाखाली येऊन सहकार विभागाकडून शहरात मतदान प्रक्रिया राबविली जात असल्याचा विरोधी आघाडीचा आरोप आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस जिह्यात अतिवृष्टीचे असून महापूराचे सावट आहेत. अशा परिस्थितीत चंदगड, गगनबावड्य़ासह सर्वच तालुक्यातील शिक्षकांना मतदानासाठी कोल्हापूरात येणे शक्य नाही. परिणामी अनेक शिक्षक मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीप्रमाणे तालुका पातळीवर मतदानाची सोय करावी अशी शिक्षकांतून मागणी होत आहे.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पतसंस्थेच्या सत्तारूढ आणि विरोधी आघाडीत चुरशीचा दुरंगी सामना होत असून 21 जागांसाठी 47 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 8 हजार 526 सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडी विरोधात राजर्षी शाहू विकास आघाडीने दंड थोपाटले आहेत. दादा लाड यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली असून पुन्हा आपल्याच ताब्यात सत्ता देण्याचे त्यांच्याकडून आवाहन केले जात आहे. तर विरोधी आघाडीकडून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी प्रचारात उडी घेतल्यामुळे निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात चुरश निर्माण झाली आहे. प्रचारामध्ये दोन्ही आघाडीकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी गटाकडून आमदार आसगावकर यांनी निवडणूक लादल्याचा आरोप केला जात आहे. तर शिक्षक बँक निवडणुकीत आमदार आसगावकर यांना पराभूत करण्यासाठी दादा लाड यांनी कसे प्रयत्न केलेत, आणि 17 वर्षांतील सत्ता कालावधीत त्यांनी कोणता ‘कारभार’ केला याचा लेखाजोखा विरोधी आघाडीकडून प्रचार मेळाव्यात मांडला जात आहे. यामध्ये कोणाची बाजू खरी, आणि रेटून बोलून कोण सत्य लपवत आहे, याची गुरुजींना पक्की जाणिव आहे. त्यामुळे मुलांना शिक्षणाचे धडे देणारे गुरुजी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्हा पातळीवर मतदान घेण्याचा अट्टाहास कशासाठी ?
‘कोजिमाशि’च्या मतदानासाठी सहकार विभागाकडून सुरुवातीस 10 जुलै ही तारीख जाहीर करण्यात आली. पण याच दिवशी आषाढी एकादशी आणि बकरी ईद असल्यामुळे त्या दिवशी मतदान घेण्यासाठी सभासदांतून विरोध झाला. त्यामुळे पुन्हा ही तारीख बदलून 9 जुलै रोजी मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली. पण हे मतदान प्राथमिक शिक्षक बँकेप्रमाणे तालुका पातळीवर घेण्याऐवजी कोल्हापूर शहरात जिल्हा पातळीवर एकाच ठिकाणी घेतले जाणार आहे. सद्यस्थितीत भारतीय हवामान विभागाने पुढील पाच ते सहा दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिह्यात महापूर येण्याची शक्यता असून अनेक मार्ग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाकडूनही नागरीकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. अशा अतिवृष्टीच्या काळात दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावरून चंदगड, शाहूवाडीसारख्या दुर्गम तालुक्यातील शिक्षकांना मतदानासाठी कोल्हापूरमध्ये येणे शक्य नाही. त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. मग तालुका स्तरावर मतदान घेण्याऐवजी जिल्हा पातळीवर मतदान घेण्यासाठी सहकार विभागाकडून अट्टाहास का केला जात आहे ? यामध्ये काय गौडबंगाल दडले आहे ? असा सवाल विरोधी आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. विशेष बाब म्हणजे विरोधी आघाडी प्रमुखांकडून तालुका स्तरावर मतदान घेण्याची मागणी केली असतानाही सहकार विभागाकडून त्याची दखल घेतली नसल्याचे समजते.