आर्थिक चणचण, मुलाचे संगोपन करण्यास असमर्थ ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
कोल्हापूर प्रतिनिधी
आर्थिक चणचण गतिमंद मुलाचे संगोपन करण्यास असमर्थता आल्याने पित्याने पोटच्या पोराची हत्या करुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी शिवाजी पेठ येथील चंद्रेश्वर गल्लीमध्ये घडली. दिलीप शंकरराव जाधव (वय 60) यांचा कीटकनाशक प्राशन केल्यामुळे शनिवारी (दि. 16) सकाळी सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मुलगा केदार (वय 26, दोघे रा. चंद्रेश्वर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) याला दम लागत असल्याने सीपीआरमध्ये दाखल केले असता, शुक्रवारी (दि. 15) रात्री 10 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पिग्मी एजंट म्हणून काम करणारे दिलीप जाधव यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या दोन मुली विवाहित आहेत. केदार या गतिमंद मुलासह ते शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीत राहत होते. मुलाच्या आंघोळ – पाण्यापासून ते औषधोपचारापर्यंत सर्वकाही ते स्वत:च पाहत होते. उतारवयात गतिमंद मुलाला सांभाळताना त्यांची प्रचंड दमछाक सुरू होती. तरीही जणू काही मुलासाठीच त्यांचे जगणे सुरू होते. मुलाला सोबत घेऊनच ते सर्वत्र फिरायचे. त्यामुळे शिवाजी पेठेत या बाप-लेकांमधील जिव्हाळा कुतुहलाचा विषय होता. शुक्रवारी सकाळी त्यांनी राहत्या घरात कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास मुलगा केदार याला श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरू झाला. बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये दाखल केलेल्या केदारचा रात्री 10 च्या सुमारास मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर अवघ्या दहा तासांत म्हणजे शनिवारी सकाळी आठच्या सुमारास त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. एकमेकांसाठी जगणाऱ्या बाप-लेकाने अवघ्या दहा तासांत एक्झिट घेतल्याने शिवाजी पेठेत हळहळ व्यक्त होत आहे.
केदारचा व्हीसीआर राखीव
दिलीप जाधव यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्यांचा मुलगा केदार याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. त्यामुळे सीपीआरमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा व्हीसीआर राखीव ठेवला. अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
आर्थिक चणचण
पिग्मी गोळा करणारे दिलीप जाधव यांचे वय वाढत होते. यामुळे शरीर साथ देत नसल्याने गतिमंद मुलाचा सांभाळ होत नाही. आपल्या माघारी त्याचे कसे होणार याची चिंता त्यांना नेहमी लागून राहिली होती. त्याची वाताहत होण्यापेक्षा दोघांचेही आयुष्य संपवू, या विचारातून दिलीप जाधव यांनी स्वत: कीटकनाशक प्राशन करून मुलालाही ते पाजले असावे, असा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला.