कोरोनानंतर रस्ते अपघातात पुन्हा वाढ, वेगावर नियंत्रण हवे, चिमुकल्यांचे निष्पाप बळी
भिकाजी मसवेकर / कोल्हापूर
गेल्या महिन्याभरापासून अपघातांची मालिका सुरुच आहे. यामध्ये किरकोळ, गंभीर जखमींपासून ते मृतांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. येवलेवाडी फाटा, तवंदी घाट, पुईखडी, धारवाड आदी ठिकाणी भीषण अपघात झाले. यामध्ये मृतांची सर्वाधिक संख्या आहे. तसेच वेगवगेळय़ा ठिकाणी झालेल्या अपघातात मृत व जखमींची संख्याही लक्षणीय आहे. तर उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 25 ठार झाल्याची दुर्दैवी घटना ताजी आहे. कोरोनानतंर अपघातात वाढ होताना दिसून येत आहे. अशा अपघातात निष्पाप बळी जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत आहे.
कोरोना नंतरच्या प्रदीर्घ काळानंतर रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. निर्बंध शिथील झाल्याने कार्यक्रमांची धामधूम पहिल्यासारखी सुरु झाली. त्यामुळे वाहनांनी रस्ते पुन्हा गजबजले. दोन वर्षानंतर सर्व सुरळीत सुरु असताना रस्ते अपघातातही वाढ होत आहे. यावर वेळीच अंकूश ठेवून वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा चालकांच्या बेफीकिरपणामुळे रस्ते अपघातात वाढ होवून नाहक बळी जाण्याची संख्या वाढणार आहे.
लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे दळणवळण थंडावले होते. विविध धार्मिक, सामाजिक तसेच सणसमारंभाच्या ठिकाणी गर्दीसाठी निर्बंध होते. मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडत होते. त्यामुळे रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ कमी असल्याकारणाने अपघातचे प्रमाणही झपाटय़ाने कमी झाले होते. परंतू सध्या कोरानाची लाट ओसरल्याने निर्बंध शिथील केले. पुन्हा जनजीवन रूळावर येत आहे. त्यामुळे विविध कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात साजरे होत आहेत. पर्यटन स्थळे गर्दीनी फुलून गेली आहेत. याचा परिणाम म्हणजे रस्त्यावरील वाहतूक वाढली आणि परिणामी अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे वृत्त कानावर पडत आहे. यामध्ये चालकांचा बेफीकीरपणाच समोर येत आहे. असे असले तरी प्रवास करणाऱया इतर प्रवाशांचा मात्र यामध्ये नाहक बळी जात आहे. काही कुटुंबच्या कुटुंब यामध्ये उद्ध्वस्त होत आहेत. कुटुंबातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने तर कुटुंबाचा कणाच मोडत आहे. ज्यांनी अजून जगच पाहिले नाही, ज्यांची तसूभरही चूक नाही, अशा चिमुकल्यांच्या मृत्यूने तर हृदय पिळवटून निघत आहे.
वाहनांच्या वेगावर मर्याद हव्यात
उद्योग-व्यवसाय मोठय़ा प्रमाणात सुरु झाल्याने रस्त्यावर अवजड वाहनांची संख्याही वाढली आहे. या वाहनांचे चालक सुसाट वेगाने वाहने चालवताना दिसत आहेत. काही ठिकाणी ओव्हरटेक करण्याच्या नादात तर काही चालक मद्यधुंद अवस्थेत अपघात ओढावून घेत आहेत. यामध्ये चुकी नसतानाही निष्पाप बळी जात आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी आपल्या कुटुंबाबरोबरच इतरांच्या कुटुंबाचा विचार करून वेगावर नियंत्रण ठेवायला हवे. तर काही दुचाकीस्वार स्टंटबाजी करण्याच्या नादात जीव गमावत आहेत.
शुभ घटनांवर विपरीत परिणाम
सध्या शुभ मुहूर्त साधून अनेक ठिकाणी लग्नसराई, विविध समारंभ पार पडत आहेत. यासाठी प्रवास करतानाही मोठय़ा प्रमाणात अपघात होत आहेत. अशा आनंदाच्या प्रसंगावर दुःखाच डोंगर कोसरळत आहे.
चालकांनी सतर्क रहायला हवे
वाहन चालवताना चालकांनी सतर्कता बाळगायला हवी. कुटुंबाचा विचार करूनच वाहनाच्या वेग ठेवला पाहिजे. आपल्या चुकीमुळे इतरांचा निष्पाप बळी जातो याची जाणीव ठेवून वाहन चालवले पाहिजे. कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूने तर अनेक कुटुंबाची परवड होताना दिसत आहे. त्यामुळे वाहन चालवताना आपल्याबरोबरच इतरांच्या जिवाशी खेळू नये.
अपघातांची मालिका पुढीलप्रमाणे
दिनांक ठिकाण मृत्यू जखमी
14 मे पेठवडगाव 01 —
15 मे रजपूतवाडी — 15
18 मे विचारेमाळ 01 —
20 मे गडहिंग्लज —- 03
22 मे धारवाड 09 13
5 जून येवलेवाडी फाटा 05 —
6 जून पुईखडी 02 02
याचबरोबर किरकोळ अपघात होवून जखमी झालेल्यांची संख्याही अधिक आहे.