कोल्हापूर / प्रतिनिधी
रविवारची ( २१ ऑगस्ट ) रात्र.. विवेक आई वडिलांसोबत जेवून झोपी गेला. मध्यरात्री १२ वाजता अचानक तो मम्मी..मम्मी असे जोरजोराने ओरडू लागला. त्यामुळे घरातील आई वडील आणि बहिण तिघेही खडबडून जागे झाले. त्यांनी विवेकला पाहिले तर त्याचे डोळे बंद मात्र हाक मारणे सुरु होते. सर्व कुटूंबियांनी त्याला डोळे उघडण्यास सांगितले. पण डोळे न उघडताच त्याची मम्मीला आर्त हाक सुरुच होती. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर छाती भरल्यामुळे काही क्षण श्वास कोंडला आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवठा झाला नसल्यामुळे तो कोम्यात गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर कुटूंबियांनी पुढील आठ दिवस अखंडीतपणे उपचार सुरु ठेवले. पण रविवारी (२८ ऑगस्ट) आठव्या दिवशी शुद्धीवर येऊन कुटुंबियांशी दोन शब्द बोलून विवेकने अखेरचा श्वास घेतला.
करवीर तालुक्यातील चिंचवडे गावचे प्रतिष्ठीत नागरीक दैनिक तरुण भारतचे ( Tarun Bharat) वरिष्ठ जाहीरात प्रतिनिधी राजाराम पाटील यांचा मुलगा विवेक पाटील (वय १७) हा गावात सर्वांचा लाडका. दुसरी इयत्तेत असताना त्याला मेंदूज्वर आल्यामुळे तेथून पुढे त्याच्या शारीरिक हालचालींवर काहीअंशी मर्यादा आल्या. पण वडील राजाराम पाटील व त्यांच्या पत्नीने हार न मानता त्याच्यावर ऍलीओपॅथी आणि होमीओपॅथी उपचार सुरुच ठेवले. शारिरीक हालचाली मंदावलेल्या असताना देखील विवेकने गेल्या शैक्षणिक वर्षात दहावी परिक्षेत ६० टक्के गुण मिळवून यश संपादन केले होते . वैद्यकीय उपचारामुळे विवेक पूर्वीप्रमाणे बरा होईल अशी आई – वडिलांना अपेक्षा होती. पण आठ दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेला विवेक अखेर लढता…. लढता हरला.