वाकरे / प्रतिनिधी
कुडीत्रे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी शुक्रवार दि.६ पासून सुरु होत आहे. गेले दोन वर्ष कोरोना व महापुराच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला मुदतवाढ मिळाली होती. करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे काम पाहणार आहेत.
शुक्रवार दि.६ ते गुरुवार दि. १२ जानेवारीअखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी शुक्रवार दि.१३ रोजी होणार आहे.वैध उमेदवार यादी १६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.त्यानंतर सोमवार दि. १६ ते सोमवार दि. ३० जानेवारीअखेर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. निवडणुकीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटप मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.त्यानंतर १ फेब्रुवारी पासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे.या निवडणुकीसाठी रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक डिसेंबर २०१५ मध्ये झाली होती.२९ डिसेंबर २०२० अखेर संचालक मंडळाची मुदत होती. मात्र मार्च २०२० पासून देशात कोरोनाची लाट आल्याने व त्यानंतर पावसाळा आल्याने या निवडणुकीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने मुदतवाढ दिली होती. त्यामुळे कारखान्याची निवडणूक कधी लागणार याकडे परिसरातील राजकीय लोकांचे आणि सभासदांचे लक्ष लागून राहिले होते. २००४ सालापासून कारखान्यावर माजी आमदार, विद्यमान चेअरमन चंद्रदीप नरके यांच्या “नरके गटाची” सत्ता आहे. आगामी निवडणुकीत विरोधक “राजर्षी शाहू आघाडीच्या” झेंड्याखाली एकत्र येण्यासंदर्भात बैठका झाल्या आहेत.राजर्षी शाहू आघाडी, यशवंत मंच,शेतकरी संघटना आणि कुंभी कासारी बचाव मंच या सर्व गटांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जागा वाटपामध्ये ही आघाडी एकत्र राहणार काय ? यावर निवडणुकीची चुरस अवलंबून आहे. विद्यमान चेअरमन चंद्रदीप नरके हे सध्या आपल्या पॅनलच्या बांधणीसाठी नियोजन करीत असून नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांच्या आघाडीला मिळालेले यश त्यांच्या गटाला उभारी देणारे आहे.