मडगाव – केपे मुख्य रस्त्यावरील वाहतूक चांदरमार्गे वळविली, पारोडातील बाजार, शेती-बागायती जलमय
वार्ताहर /केपे
राज्यात पावसाचा जोर कायम असल्याने अवघ्या दोन दिवसांत दुसऱयांदा कुशावती नदीला पूर आला असून पारोडा येथील पूल पाण्याखाली जाण्याबरोबर मडगाव ते केपे मुख्य रस्ता, आजुबाजूचा परिसर, पारोडा बाजार हे सर्व जलमय होऊन गेले आहे. पाण्याची स्थिती पाहून स्थानिकांकडून मदतकार्याकरिता लहान होडीही पारोडा येथे आणली गेली आहे. पाणी भरल्याने शुक्रवारी सकाळपासून मुख्य रस्त्यावरील वाहतूक चांदरमार्गे वळवण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने मंगळवारी यंदाच्या मोसमात पहिल्यांदा कुशावती नदीला पूर येऊन पारोडा पूल, मडगाव-केपे मुख्य रस्ता पाण्याखाली जाण्याची घटना घडली होती. त्यावेळी पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुनील चव्हाण या व्यक्तीला कुशावती नदीतून अग्निशामक दलाने सुखरूप बाहेर काढले होते. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याची पातळी कमी झाली होती. पण गुरुवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने व शुक्रवारी राज्यात रेड अर्लट जाहीर केल्याने पाण्याची पातळी वाढणार हे नक्की मानले जात होते.
त्याप्रमाणे अवघ्या दोन दिवसांत पुन्हा कुशावती नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने पूर आला असून पहिल्या घटनेपेक्षा पाण्याची पातळी जास्त वाढली आहे. पारोडा पूल पाण्याखाली गेलेला असून पारोडा पंचायत, पारोडा बाजार धरून पर्वत-पारोडा रस्त्यापर्यंतचा मुख्य रस्ता व आजुबाजूची शेती, बागायती जलमय झाल्याने स्थानिकांनी सावधगिरी बाळगावी, असे सागण्यात आले आहे.
मदतकार्याकरिता आणली होडी
पारोडा बाजारही जलमय झाल्याने स्थानिकांनी मदतकार्याकरिता होडीची सुविधा उपलब्ध केली आहे. मडगाव-केपे मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने सकाळपासूनच कुडचडे, सांगे, केपे, नेत्रावळी या भागांतून मडगावला जाणारी वाहतूक गुडी-पारोडा येथे प्रशासनातर्फे अडवून चांदरमार्गे वळविण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. कुशावती नदीला पूर येणे म्हणजे फक्त पारोडा भागातील लोकांवरच नव्हे, तर अनेकांवर याचा परिणाम पाहायला मिळतो. खास करून मडगावला कामाला जाणाऱया लोकांची गैरसोय होत असते. कावरेपिर्ला, सुळकर्णा आदी भागांतही मुसळधार पाऊस असून या भागांतून येणारे पाणी कुशावती नदीला मिळत असते. कुशावती नदी केवण, रिवण, जांबावली अशी वाहत येऊन केपेतून पुढे पारोडा येथे जात असते. वर्षातून तीन-चार वेळा तरी या नदीला पूर येत असतो, मात्र या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने अजूनही ठोस उपाययोजना झालेली नाही.