भारतात मतदानाची खूण म्हणून डाव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्याची पद्धत आहे. मात्र, बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आता नवा फंडा वापरणार आहे. मतदान केल्यानंतर आता शाई ऐवजी लेझर मार्क लावला जाणार आहे. यावर्षी होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ही नवी प्रणाली लागू केली जाऊ शकते.
निवडणूक आयोग अवलंबणार असलेले हे लेझर तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित राहणार आहे. त्या मशीनमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे. त्यामुळे बोगस आणि दुबार मतदानाला आळा बसेल. तसेच लेझर तंत्रज्ञानामुळे मतदान प्रक्रियेतील घोटाळेही थांबतील.
यंदा मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम, छत्तीसगड या राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी झाला तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही प्रणाली लागू करण्यात येईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात येते. परिणामी या यंत्रणेमुळे शाईचा वापर कालबाह्य होईल.