सत्तरीतील सर्व पंचायत, वाळपई नगरपालिकेतर्फे निवेदनाद्वारे परवानगी न देण्याची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
वाळपई : म्हादई फॉर-टुगेदर या आर.जी पक्षाने सुरू केलेल्या पदयात्रेमुळे सत्तरी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे त्याचे विपरित परिणाम या भागातील जनतेवर होण्याची शक्यता असल्यामुळे या पदयात्रेला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी सत्तरी तालुक्यातील 12 ग्रामपंचायत व नगरपालिकेने उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सोमवारी या पक्षाने ठाणे येथून पदयात्रेला सुऊवात केली होती. या पदयात्रेला म्हाऊस पंचायतीने हरकत घेतल्यामुळे ही पदयात्रा रोखण्यात आली होती. त्यानंतर कोपर्डे या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पदयात्रेसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली परवानगी ताबडतोब मागे घेतल्यामुळे या संदर्भात आक्रमक भूमिका घेऊन आमदार वीरेश बोरकर यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून या संदर्भाचा निषेध व्यक्त केला होता. या पदयात्रेला विरोध करणाऱ्या चार जणांची नावे जाहीर करा, तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, अशा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उपजिल्हाधिकारी प्रवीण परब यांच्याशी या आरजीच्या कार्यकर्त्यांची चर्चा झाली. अखेर मंगळवारी 3 वाजता या संदर्भाची सुनावणी आपण घेणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले होते.
दरम्यान मंगळवारी दुपारी सत्तरी तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, पंच तसेच वाळपई नगराध्यक्ष सेहझीन शेख आदींनी उपजिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करून या पदयात्रेमुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊन सर्वसामान्य जनतेला याचा त्रास झाला. यापुढेही तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या पदयात्रेला परवानगी देऊ नये, असे विनंती केली. दरम्यान, मोर्ले पंचायतीचे सरपंच अमित शिरोडकर यांनी ही पदयात्रा सत्तरीत सुरू करण्यात आमचा विरोध आहे. कारण सोमवारी अशाच प्रकारची घटना घडली होती. यातून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्यांनी ही पदयात्रा काढलेली आहे त्यांनी सत्तरी तालुक्यातील जनतेची काळजी करण्याची कोणतीही गरज नाही., असेही मत त्यांनी व्यक्त केले. होंडा सरपंच शिवदास माडकर यांनी पदयात्रेच्या माध्यमातून म्हादईचे रक्षण होणार का? असा सवाल केला. बाहेरच्या नागरिकांनी सत्तरी तालुक्यातील जनतेला म्हादई संदर्भात धडे देण्याची गरज नाही. म्हादई नदीचे रक्षण व संरक्षण करण्याची क्षमता सत्तरी तालुक्यातील जनतेवर आहे. विश्वजीत राणे व डॉ देविया राणे यांच्या भूमिकेवर आमच्या पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे पदयात्रेच्या माध्यमातून तालुक्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास सहन करणार नाही, इशारा यावेळी त्यांनी दिला. नगरगाव सरपंच संध्या खाडिलकर यांनी यावेळी नदी संदर्भात गोवा सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे. राजकीय स्वार्थ साधण्यसाठी पदयात्रा काढू नका, असे आवाहन केले. भिरोंडा सरपंच उदयसिंग राणे यांनी म्हादईसाठी लढाई सत्तरी तालुक्यातून पहिली लढाई सुरू केलेली आहे. विश्वजीत राणे व दिव्या राणे यांच्या एकूण भूमिकेवर आमचा विश्वास आहे. पदयात्रेच्या माध्यमातून म्हादईचे संवर्धन होणार नाही, असे सांगितले. पिसुर्ले सरपंच देवानंद परब, केरी सरपंच दीक्षा गावस, पर्ये सरपंच रती गावकर, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, सावर्डे सरपंच उज्वला गावकर, खोतोडा सरपंच नामदेव राणे, गुळेली सरपंच नितेश गावडे, ठाणे सरपंच सरिता गावकर आदीनींही आरजीच्या पदायात्रेला विरोध दर्शविला.
पदयात्रेद्वारे वातावरण बिघडवू नका : शेख
पदयात्रांमधून जनतेला कोणताही लाभ होणार नाही. उलट यामुळे तालुक्यातील सामाजिक वातावरण बिघडून सर्वसामान्य जनतेला त्याचा त्रास होणार आहे. याचे भान आरजीच्या कार्यकर्त्यांनी राखावी, असे आवाहन नगराध्यक्ष सेहजीन शेख यांनी केले.