सरुड परिसरातील ही सातवी घटना ; शेतकऱ्यांची बंदोबस्ताची मागणी
शाहूवाडी (कोल्हापूर) : वडगाव ( ता. शाहूवाडी) येथील महादेव बाजीराव पाटील यांच्या जनावरांच्या शेडमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेळी आणि वासरू यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पंधरा दिवसातील सरुड परिसरातील ही सातवी घटना आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बिबट्यांचे हल्ल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वारंवारच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त असून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी परिसरातून व्यक्त होत आहे.
मानवी वस्तीलगतच्या जनावरांच्या शेडमध्ये असणाऱ्या पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत आहेत. यापूर्वी सरुड, शिंपे, वारणा कापशी, शिवारे, लगारेवाडी या ठिकाणी देखील पाळलेल्या शेळ्यांच्यावर हल्ला केला आहे. मंगळवारी संध्याकाळी सरूड येथील लक्ष्मीचा माळ येथील जनावरांच्या वस्तीवर बिबट्याने हल्ला करून पाळीव कुत्र्याला ठार केले होते. तर बुधवारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये शेळी फस्त तर वासराला गंभीर जखमी केले. यामध्ये वासराचा देखील मृत्यू झाला आहे.
हेही वाचा- शाब्बास ! कुरुंदवाडच्या चहा विक्रेत्याची मुलगी बनली आंतरराष्ट्रीय वेटलेफ्टर विजेती
गेल्या आठवडयाभरात प्रत्येक दिवशी अथवा दिवसाआड बिबट्याचे हल्ले जनावरांच्या वस्तीवर होत आहे. वडगाव येथे तर राहत्या घराच्या शेजारी लागून असणाऱ्या शेडमध्ये हल्ला झाला परंतु भितीपोटी कुटुंबीय प्रतिकार करू शकले नाहीत.वन विभागाकडून सदर घटनेचा पंचनामा केलेला आहे. सरूड परिसरामध्ये वाढत चाललेल्या बिबट्यांच्या हल्ल्यावरती वन विभागाने कायमस्वरूपी उपाय शोधावा अथवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी आग्रही मागणी सर्वसामान्य शेतकरी वर्गातून होत आहे.