एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांचे आवाहन, कुंकळ्ळीत भाजपाच्या गरीब कल्याण संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /कुंकळ्ळी
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाश्चात्य राष्ट्रे आदर-सन्मान करत आहेत. एक वेळ भारताला तुच्छ लेखणारे पाश्चात्य देश आज भारतीयांना आस्थेने सन्मानपूर्वक वागणूक देत आहेत. हे सर्व सुखद दिवस पाहण्याची संधी पंतप्रधान मोदी यांच्यामुळे भारतीयांना मिळत आहे. पाश्चात्य देश त्यांची ताकद ओळखून आहेत. पंतप्रधान मोदी हे देशाला लाभलेले कणखर नेतृत्व असून त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण वावरूया, असे आवाहन एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी कुंकळ्ळीत बोलताना केले.
भाजपच्या गरीब कल्याण संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार विनय तेंडुलकर, माजी आमदार क्लाफासियो डायस, राजन नाईक, जिल्हा पंचायत सदस्या संजना वेळीप, नगरसेवक विदेश देसाई व विशाल देसाई, राहुल देसाई, पोलिता कारनेरो, रूपा गावकर, पारोडा सरपंच दीपक खरंगटे, बाळळी सरपंच राजू गोसावी, पंच दिपाली फळदेसाई, विष्णुदास नाईक, भाजप मंडळाचे अध्यक्ष मारूती देसाई, सचिव शंकर देसाई, उपाध्यक्षा जॉर्जिना गामा, सरचिटणीस संदीप हरमलकर व पंचायतींचे उपसरपंच, पंच उपस्थित होते.
मुख्यमंत्रीपदावरून जेव्हा मोदी पंतप्रधानपदी पोहोचले त्यावेळी विरोधकांकडून त्यांची हेटाळणी केली जायची. त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे संधी विरोधकांनी सोडली नाही. मात्र मोदी कुठेच कमी पडले नाहीत. भाजपच्या मागील 8 वर्षांच्या राजवटीत जो विकास साधला गेला आहे त्याला तोड नाही, असे सावईकर म्हणाले. युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयाना मायदेशात सुखरूप आणण्याचे काम पंतप्रधान मोदींनी साधले. यात गोव्यातील 21 विद्यार्थी सुरक्षितरीत्या आले. कोविडच्या संकटात सापडलेल्या व विदेशात नोकरी करणाऱया 7 ते 8 लाख भारतीयांना सुखरूप आणण्याचे काम यशस्वीरीत्या बजावले. देशात कोविड प्रतिबंधक लस तयार करून ती लोकांना मोफत उपलब्ध करून दिली. कोविड काळात अन्नधान्य पुरविण्यासाठी योजना राबविली. याअंतर्गत 82 कोटी लोकांना अन्नधान्य मिळाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एनआयटीचा पहिला टप्पा लवकरच पूर्णत्वास
कुंकळ्ळीत आधी एनआयटीच्या जमिनीसंदर्भात प्रश्न निर्माण झाले होते. हा प्रकल्प मार्गी लागून आता त्याच्या पहिल्या टप्प्याचे पुढील काही महिन्यांत उद्घाटन होणार आहे. या प्रकल्पामुळे वेगवेगळ्या व्यवसायांच्या संधी लोकांना उपलब्ध होणार आहेत. चांदर येथे रेल्वे अंडर बायपास उभारण्यासाठी तत्कालीन आमदार डायस यांच्याबरोबर आपण स्वतः पाहणी केली होती. नंतर पाठपुरावा डायस यांनी केला. कुंकळ्ळीत डायस यांना बरीच विकासकामे करता आली. आता ते आमदार नसल्याने त्यांची उणीव काही महिन्यांतच लोकांना भेडसावू लागली आहे. यापुढे डायस यांच्यामागे खंबीरपणे राहावे, असे आवाहन सावईकर यांनी केले.
भाजप सत्तेत असल्याने विकास : तेंडुलकर
पंतप्रधान मोदींच्या यशस्वी नेतृत्वामुळे 335 खासदार येत्या निवडणुकीत निवडून येतील, असा विश्वास खासदार तेंडुलकर यांनी व्यक्त केला. राज्यात व उर्वरित देशात विकास हा केवळ भाजप सत्तेत असल्यामुळे शक्य झाला आहे अणि बहुमत लाभल्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात यश आले. केंद्रात पंतप्रधान मोदी व गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत सुशासन देत आहेत हे नाकारता येणार नाही. मोदींनी शेतकऱयांचे हित लक्षात घेऊन राबविलेल्या योजनेखाली गोव्यात 2900 शेतकऱयांच्या बँक खात्यांत वर्षाकाठी 6 हजार रु. जमा होतात, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस काळात कुंकळ्ळीहून पणजीला जायला दोन-अडीच तास लागायचे. आज तेच अंतर एक ते सव्वातासात कापता येते. कॉग्रेस काळात राष्ट्रीय महामार्गाचे काम दिवसाला 9 ते 10 किलोमीटर असे संथगतीने चालायचे. आज तेच काम भाजप सरकारच्या काळात 32 ते 35 किलोमीटर या वेगाने जोरात चालले आहे, याकडे तेंडुलकर यांनी लक्ष वेधले. कुंकळ्ळीत आमदार डायस यांनी भाजपात प्रवेश करून विकासाला गती दिली होती. आज ते आमदार नाहीत. लोकांना त्यांची आवश्यकता कळून चुकली आहे, असे ते म्हणाले. सावईकर यांच्या कामाची प्रशंसा करताना त्यांनी यावेळी दक्षिण गोव्यात भाजपचा खासदार निवडून येईल, असा विश्वास व्यक्त केला.
माजी आमदार डायस यांनी आपल्या भाजप प्रवेशाचे समर्थन केले. मतदारसंघात अनेक विकासकामे पूर्ण करण्यात भाजपमुळे यश आले. मुख्यमंत्री सावंत यांचे सहकार्य लाभले. गोव्यात भाजप सरकार पुन्हा सत्तेवर येईल याची खात्री आपण दिली होती. या सरकारात मी असतो, तर उरलीसुरली विकासकामे करणे शक्य होते, असे ते म्हणाले. यावेळी भाजपला हवे तेवढे मतदान झाले नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. आज लोकांना काय ते कळून चुकले आहे. यापुढे लोक चुका करणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण गोव्यात सावईकर यांना आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त करताना कुंकळ्ळी मतदारसंघात आघाडी मिळविण्याचा विश्वास डायस यांनी व्यक्त केला. मारूती देसाई यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन हरमलकर यांनी केले व खजिनदार विशाल कालेकर यांनी आभार मानले.