भुवनेश्वर
ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील न्यायालयाने 17 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्हेगारांवर 3 वर्षांपूर्वी जादूटोणा केल्याच्या संशयातून एका दांपत्याला जिवंत जाळल्याचा आरोप होता. न्यायालयाने गुन्हेगारांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.
कलिंग नगरच्या निमापाली गावात 7 जुलै 2020 रोजी रात्री काही ग्रामस्थांनी एका दांपत्याच्या घरात बळजबरीने प्रवेश केला होता. शैला बलमुज आणि सांबरी बलमुज अशी या जोडप्याची नावे होती. ग्रामस्थांनी दांपत्यावर हल्ला करत घराला पेटवून दिले होते. या घटनेत दांपत्याचा होरपळून मृत्यू झाला होता. जाजपूर न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ऋषिकेश आचार्य यांच्यासमोर याप्रकरणाची सुनावणी पार पडली आहे. सुनावणीदरम्यान 20 साक्षीदारांचे जबाब आणि पुरावे पडताळून पाहिले गेले. त्याच्याच आधारावर न्यायाधीशांनी दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील रजत कुमार राउत यांनी दिली आहे.