संमेलनाध्यक्ष नितीन सावंत यांचे मत : कडोली येथे 38 वे मराठी साहित्य संमेलन उत्साहात : चार सत्रात संमेलन : अनेक मान्यवरांची उपस्थिती
वार्ताहर /किणये, कडोली
साहित्य आणि जनमानसाचा संपर्क अलीकडे तुटला आहे. त्याग आणि समर्पण करणाऱ्यांचा इतिहास लिहिला जातो. त्यामुळे चांगले कार्य करा, लोकहितासाठी जगा. साहित्याला नवी दिशा देण्याची गरज आहे. साहित्य समाजात परिवर्तन घडविण्याचे कार्य करते. त्यामुळे साहित्यिकांनी लोकमनाचा ठाव घेतला पाहिजे, असे मत परभणी येथील नितीन सावंत यांनी व्यक्त केले.
38 व्या कडोली मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी संमेलनाध्यक्ष या नात्याने नितीन सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाजव्यवस्थेला माणुसकी शिकविणे हीच खरी समाजसेवा होय. जो दुसऱ्याच्या अडीअडचणीवेळी उपयोगी पडतो त्यालाच संत साहित्यामध्ये सज्जन म्हणतात. साहित्याचा केवळ बोलबाला न होता, सर्वसामान्य जनतेच्या वेदना मांडणारे साहित्य लिहिले पाहिजे.
सावंत यांनी शिक्षण व्यवस्थेवरही ताशेरे ओढले. आजची शिक्षण व्यवस्था, सध्याचा अभ्यासक्रम बोलक्या पोपटासारखा झाला आहे. आई-बाबांशी कसे वागावे, हे अभ्यासक्रमात आहे का? नितीमूल्ये शिकविली जातात का? त्यामुळेच समाज भरकटत चालला आहे. अशा वेळी संत साहित्यच जीवनाला दिशा दाखविते. थोर संतांनी साहित्याची निर्मिती केली आणि जनतेला माणुसकी पटवून दिली. वारकरी परंपरा अस्पृश्यतेला विरोध करणारी आहे. संत साहित्य समानता शिकविणारी आहे. संत हे समतेची मांडणी करतात.
कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे कार्य घडू शकते. त्यामुळे संत साहित्याबरोबरच सीमाभागात होणाऱ्या कीर्तनांचाही आपण लाभ घ्यावा. कीर्तन म्हणजे स्वानुभव कथन करणे असून लोकांना गुणवान बनविण्यासाठी, शहाणे करण्यासाठी कीर्तने सुरू झाली असावीत. कीर्तनांतून समतेचा भाव शिकविण्यात आला आहे.
आपुलकी निर्माण करून वैचारिक गुणवत्ता रुजविण्यासाठी प्रत्येक घरात संतांच्या ग्रंथांची गरज आहे. संतांनी बीज पेरणी ते पीक कापणीपर्यंतचे अभंग समाजाला दिले आहेत. जीवन कसे जगावे, हे संत सांगतात. म्हणूनच आपण संत साहित्यच डोक्यावर घेतो. संतांच्या साहित्याचा लोकजागर संमेलनांच्या माध्यमातून केला पाहिजे.
संत संप्रदायामध्ये जातीभेद नसल्याने ख्रिश्चन, मुसलमान बांधवही पंढरीची वारी करतात. लेखन करणाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या वेदना मांडल्या पाहिजेत. कष्टकऱ्यांचे, गावकऱ्यांचे जीवन दाखविणारे चित्रपट निर्माण व्हायला हवेत. सौंदर्याचा रंग केवळ गोरा नसून खरे सौंदर्य कष्ट करण्यात आहे. कष्ट केल्याने जीवन जगण्यात नवी उमेद मिळते. मराठी भाषा सतत वाहणाऱ्या झऱ्यासारखी आहे. तिचे जतन प्रत्येकाने केले पाहिजे. ग्रामीण समाजाला न्याय देण्याचे कार्य साहित्य संमेलने करतात, असेही नितीन सावंत यांनी सांगितले.
मानवाची प्रगती मातृभाषेतून
तिसऱ्या सत्रात डॉ. संजय कळमकर यांनी विनोदी किस्से सांगून खळखळून हसविले. माणसाची खरी प्रगती मातृभाषेतूनच होते. त्यामुळे मातृभाषेचा अभिमान बाळगा. मराठी भाषा सगळ्या भाषांना सामावून घेते. मोबाईलचा अधिक वापर झाल्यामुळे सुसंवाद कमी झाला आहे. चंचलता वाढली आहे, यावर अंकुश ठेवला पाहिजे.
इंग्रजीचे फॅड वाढू लागले आहे. मात्र, मम्मीपेक्षा आई शब्दातच अधिक गोडवा आहे, हे विसरून चालणार नाही. जिवंत माणसांचे रोबोट होत चालले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ नका, असेही संजय कळमकर यांनी सांगितले. एका लग्नाचे विविध पैलू त्यांनी विनोदी शैलीतून सादर केले.
संमेलनातील ठराव…
- मराठी देशातील समृद्ध वैभवप्राप्त भाषा असून तिला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा.
- महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेने बृहन्महाराष्ट्र मंडळाला आर्थिक तरतूद केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनाचा ठराव संमत.
- कडोलीसह बेळगाव तालुक्यातील 32 गावांच्या सुपीक जमिनीतून रिंगरोडसाठी केंद्राचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला तीव्र विरोध असून रिंगरोड झाल्यास स्थानिक शेतकरी भूमीहीन होणार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे रिंगरोड प्रस्ताव रद्द करण्यात यावा.
या तिन्ही ठरावांचे वाचन शिवाजी कुट्रे यांनी केले. त्याला टाळ्यांच्या गजरात सर्वांनी मंजुरी दिली.
ग्रंथदिंडीत साहित्यिकांचे औक्षण
टाळ-मृदंगाच्या गजरात आणि थोर पुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी व साहित्यिकांच्या सहभागात ग्रंथदिंडी उत्साहात पार पडली. हभप प्रवीण मायाण्णा यांच्या पालखी पूजनानंतर ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. श्री कलमेश्वर भजनी मंडळ व श्री कलमेश्वर सांप्रदायिक भजनी मंडळांच्या भजनाने ग्रंथदिंडी न्हाऊन निघाली. मराठी शाळेचे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊमाता, भारतमाता आदी वेशभूषेत ग्रंथदिंडीत अवतरले होते. संमेलनाध्यक्ष प्रा. नितीन सावंत, उद्घाटक यल्लोजीराव पाटील, कवी दीपक स्वामी, महेश कराडकर, नाना हलवाई, डॉ. संजय कळमकर, कुशल कुट्रे, एच. के. गावडे, मोहन पाटील, सुनील पाटील, वसंत सावंत, नेत्रा मेणसे, रुक्मिणी निलजकर, धनश्री होनगेकर, बाबुराव गौंडवाडकर, अॅड. शाम पाटील, शिवाजी हायस्कूल व प्राथमिक मराठी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, साहित्य संघाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संमेलनस्थळी श्री कस्तुरबा महिला मंडळाच्या सुवासिनींनी साहित्यिकांचे औक्षण केले.भजनी मंडळांचा टाळ-मृदंगाचा गजर आणि भजनात सहभाग घेऊन संमेलनाध्यक्ष नितीन सावंत यांनी मनमुराद आनंद घेतला. शिवाय फुगडी खेळण्यात तल्लीन झाले होते.
उद्घाटन समारंभ मोहन पाटील यांनी ग्रंथदालनाचे, पॉलिफ्लो व पॉलीहैड्रॉन पुरस्कृत स्वामी विवेकानंद संमेलननगरीचे उद्घाटन अभियंता कुशल कुट्रे, सांगाती व्यासपीठाचे उद्घाटन प्रा. एच. के. गावडे, शिवप्रतिमा पूजन माजी सैनिक सुनील पाटील, सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन वसंत सावंत, सरस्वती प्रतिमा पूजन नेत्रा मेणसे, संत ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन रुक्मिणी निलजकर आणि म. जोतिबा फुले प्रतिमा पूजन धनश्री होनगेकर यांच्या हस्ते झाले.
संघाचे अध्यक्ष बाबुराव गौंडवाडकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष अॅड. शाम पाटील यांनी सर्व साहित्यिकांचे आणि माध्यमे, पत्रकार, रसिकांचे स्वागत केले. उद्घाटक यल्लोजीराव पाटील यांनी, साहित्य संमेलनाची धुरा सांभाळणे मोठे कार्य असून येथील कार्यकर्त्यांनी ते चालू ठेवले आहे. याबद्दल कार्यकर्त्यांचे त्यांनी कौतुक केले.
कविसंमेलन
दुसऱ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन झाले. सूत्रसंचालन प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी केले. यावेळी महेश कराडकर (सांगली), डॉ. दीपक स्वामी (सांगली), नाना हलवाई (मिरज) यांनी सहभाग घेतला. श्रीराम सोसायटी कडोली याचे प्रायोजक होते.
मराठीबरोबरच अन्य भाषांचाही आदर करायला साहित्य शिकविते, असे सांगून भीमराव धुळूबुळू यांनी ‘संवाद गुरुजींशी’, डॉ. दीपक स्वामी यांनी ‘ओळख’ व ‘विंचू’ या कविता सादर केल्या.
‘दीवार’ चित्रपटातील ‘तुझ्याकडे काय आहे?’ या संवादावेळी इथल्या सीमाबांधवांकडे मराठी मातृभाषा हा श्वास आणि प्राण आहे, असे सांगितले. नागरिक मराठीवर जाज्वल्य प्रेम करतात, याबद्दल अभिमान व्यक्त केला. ‘मी इंडियात राहतो, मी भारतात राहतो, मी हिंदुस्थानात राहतो’ ही वेगवेगळ्या तीन भावंडांची कविता सादर केली.
नाना हलवाई (मिरज) यांनी मनुष्य एकदा ना एकदा प्रेम करतो, असे सांगत ‘प्रेम’ ही कविता सादर केली. यानंतर नातेसंबंधांची जाणीव करून देणारे आईबाप आणि विदेशात राहणारा मुलगा यांचा कॉम्प्युटरवरच चालू असणारा संवाद आणि चटका लावून जाणारा शेवट ही हृदयस्पर्शी ‘कॉम्प्युटर’ ही कविता सादर करून नातेसंबंध दृढ होण्यासाठी प्रयत्नांची गरज व्यक्त केली.