रोजगार मेळाव्यात शेकडो तरुण-तरुणींना मिळाला रोजगार
कोल्हापूर प्रतिनिधी
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांर्गत मंगळवारी तपोवन मैदानावर सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत भव्य आरोग्य शिबिर आणि रोजगार मेळावा झाला. यावेळी लाभार्थ्यांची तपासणी करुन त्यांना सल्ला आणि जाग्यावरच औषधे दिली. तर रोजगार मेळाव्यात शेकडो तरुण-तरुणींना रोजगार मिळाला.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाची गेल्या आठ दिवसापासून जय्यत तयारी करण्यात आली होती. शासनाच्या विविध विभागाला सूचना देवून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आवाहन केले होते. त्यासाठी नोडल अधिकाऱ्यांचीही नियुक्ती केली होती. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 1227 गावातून 28 हजार 640 लाभार्थींना आणण्यासाठी 716 बससचे नियोजन केले होते. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देशमुख यांच्या देखरेखेखाली आरोग्य तपासणी शिबिर झाले.
आरोग्य शिबिर आणि रोजगार मेळाव्यासाठी मैदानाच्या एका बाजूला भव्य मंडप उभारण्यात आला होता. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. मंडपात बालरोग, अस्थिरोग, शस्त्रक्रिया, कान-नाक-घसा, नेत्र, त्वचारोग, दंतरोग, जनरल फिजिशियनचे स्टॉल होते. या प्रत्येक स्टॉलवर फार्मासिस्ट -2, लॅब टेक्निशियन-1, डाटा ऑपरेटर-1 आणि कक्ष सेवक- 1 कार्यरत होते. संपूर्ण आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 80 ते 90 जणांचा स्टाफ कार्यरत होता.
उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत सकाळी आरोग्य शिबिराला सुरुवात झाली. मंत्री सामंत यांनी या शिबिराची माहिती घेतली. यानंतर सामंत, खासदार माने, रेखावार यांनी रोजगार मेळाव्यातील प्रत्येक स्टॉलला भेट देत या मेळाव्यातून तरुण-तरुणींना रोजगाराची संधी मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जास्तीत जास्त तरुण-तरुणींना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशा सूचना त्यांनी केल्या.
आरोग्य शिबिरामध्ये सकाळपासूनच लाभार्थींनी गर्दी केली होती. संबंधित स्टॉलवर लाभार्थी रुग्णांची तपासणी करुन त्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन केले जात होते. तसेच मोफत औषधेही देण्यात येत होती. दुपारी दीडपर्यंत आरोग्य शिबिरामध्ये सुमारे 200 लाभार्थ्यांची नोंद झाली होती. आरोग्य तपासणीसाठी लाभार्थ्यांची रिघ सुरुच होती.
नेटके नियोजन
शिबिरामध्ये लाभार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी नेटके नियोजन केले होते. लाभार्थ्यांची सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत होती. गर्दीमुळे गोंधळ उडू नये यासाठी स्टॉलची योग्य मांडणी केली होती.
अल्पोपहार-पाण्याची सोय
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांसाठी तपोवन मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. ऊन -पावसाचा लाभार्थ्यांना त्रास होऊ नये याची दखल घेतली होती. वातावरणात उष्मा असल्याने येणाऱ्या प्रत्येक नागरिकांसाठी पाण्याची सोय केली होती. प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या बाटल्या होत्या. तर बाहेरील बाजूला टॅकर उभा केला होता. तसेच लाभार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.
मोठा पोलीस बंदोबस्त
शासन आपल्या दारी हा भव्य उपक्रम असल्याने बंदोबस्तामध्ये कोणतीही कमतरता राहू नये याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली होती. सकाळी 9 वाजल्यापासून तपोवन मैदानाकडे येणाऱ्या मार्गावर आणि मैदानात मोठया प्रमाणात पोलीस तैनात होते. वरिष्ठ अधिकारी तपोवन मैदानावरील मंडपात सुरक्षेवर लक्ष ठेवून होते………..