सर्वसाधारणा सभा होणार वादळी : सत्ताधारी उत्तरे देण्यास तर विरोधक जाब विचारण्यास सज्ज
कोल्हापूर प्रतिनिधी
आरोप-प्रत्यारोपातून गोकुळच्या सर्वसाधारण सभेची रंगीत तालीम झाली असली तरी सोमवार 29 रोजी सभासदांच्या उपस्थित होणारी सभा विविध मुद्यांवरुन वादळी होण्याची शक्यता आहे. गोकुळच्या रणांगणावरुन राजकीय महाभारत अन् रामायणाला सुरवात होणार आहे. सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सत्ताधारी सज्ज आहेत. तर सव्वा वर्षातील कारभारावरुन सत्ताधाऱयांना जाब विचारण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. सभेच्या निमित्ताने पाटील-महाडिक समर्थक आमने-सामने येणार असल्याने तणावपूर्ण वातावरण असणार आहे. महासैनिक दरबार हॉल येथे दुपारी 1 वाजता सभेस प्रारंभ होईल.
कोरोना संकटामुळे गोकुळची मागील सभा ऑनलाईन पद्धतीने झाली. त्यामुळे अनेकांना सभेमध्ये प्रश्न विचारता आले नाहीत. दोन वर्षानंतर सभा ऑफलाईन पद्धतीने होत आहे. 35 वर्षानतंर गोकुळमध्ये प्रथमच सत्तांतर झाल्याने महाडिक गट यंदाच्या सभेत विरोधकांच्या भुमिकेत आहे. सभेमध्ये महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याचे नुतनीकरण, विस्तारीकरणाचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला संचालिक शौमिका महाडिक यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या प्रस्तावावरुन सभेमध्ये गोंधळ अडण्याची शक्यता आाहे.
खाडे, घाटगे, नरकेंच्या भुमिकेकडे लक्ष
सभेच्या पार्श्वभूमीवर संचालिक शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेवून सत्ताधाऱयांच्या कारभाराबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. मात्र या पत्रकार परिषदेला त्यांच्याच आघाडीमधील संचालक बाळासो खाडे, अंबरिष घाटगे, चेतन नरके हे अनुपस्थित राहिले. विरोधी आघाडीतील या तीनही संचालकांची सत्ताधाऱयांशी जवळीक वाढली असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या सभेमधील भुमिकेकडे सभासदांचे लक्ष राहणार आहे.
अध्यक्षांनी दिलेली उत्तरे हास्यास्पद शौमिका महाडिक
सभेच्या पार्श्वभूमीवर आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्षांनी तातडीने दिलेली उत्तरे हस्यापद आहेत. सभेस अजूनही काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे अभ्यास करुन सभेमध्ये अभ्यासपूर्ण द्यावीत, असा टोला संचालिका शौमिका महाडिक यांनी लगावला. पत्रकात म्हटले आहे, अध्यक्षांनी दिलेल्या उत्तरांमध्ये सहा रुपये दरवाढ म्हणजे वचनपूर्ती नव्हे हे त्यांनी मान्य केले आहे. त्यांच्या नेत्यांचा वचनपूर्तीचा दावा त्यांनीच खोडून काढला आहे. वासाचे दूध परत देणे शक्य नसल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या नेत्यांनी निवडणुक काळात आमच्यावर केलेली टिका चुकीचा होती हेही त्यांनी सिद्ध केले आहे. संस्थांची डिबेंचर्सची रक्कम, पशुखाद्य कारखान्यातील तोटा, गरज नसताना विस्तारीकरणाचा घातलेला घाट, दुधाची खालावलेली प्रत, पशुखाद्याची ढासळलेली गुणवत्ता, जिल्हय़ातील संकलनात झालेली घट आदी प्रश्नांची नेमकी उत्तरे न देता अध्यक्षांनी दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला आहे.