विकासकामांच्या जोरावरच निवडणूक रिंगणामध्ये; तब्बल 2800 कोटींचा निधी मंजूर करण्यात यश; इचलकरंजीला पाणी न आणल्यास पुढील निवडणूक लढवणार नाही.
योगींची सभा ठरणार विजयाचा मास्टरस्ट्रोक
संजय खूळ इचलकरंजी
आगामी कालावधीत सर्वच क्षेत्राला बुस्टर देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याचा रोडमॅप तयार आहे. तर आतापर्यंत समाजातील विविध घटकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. या सर्वांच्या पाठबळावरच लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टर्मसाठी मी उभा आहे. माझ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील 563 पैकी 510 गावात एकाचवेळी माझी कामे सुरु आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या दहा वर्षाच्या कालावधीपेक्षा जास्त कामे गेल्या दोन वर्षात केली आहेत. त्या जीवावर मी निवडणुकीसाठी उभा आहे. अत्यंत अल्प कालावधीत केलेल्या विकासकामांच्या जोरावर मला मतदार बंधू-भगिनी पुन्हा एकदा विजयी करतील, असा विश्वास हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.
गेल्या पाच वर्षातील विकास कामांचा लेखाजोखा मी मतदारांसमोर मांडला आहे. माझ्या कारकिर्दीत पहिली अडीच वर्षे कोरोनात गेली. उर्वरीत अडीच वर्षात मतदारसंघासाठी तब्बल 8200 कोटींचा निधी मंजूर करुन आणला. या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हर घर जल योजना यशस्वीरित्या राबवली. रोजगार निर्मितीसाठी विविध भागात नवीन एमआयडीसी मंजूर करुन घेतल्या. महिला सबलीकरणासाठी कार्य केले. पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव निधी मंजूर करुन आणला. ग्रामीण तरुण- तरुणींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी शिवराज्य भवनची उभारणी सुरु केली आहे. इचलकरंजीतील यंत्रमागधारकांचे प्रश्न मार्गी लावले. विविध विकासकामे मार्गी लावली. सुळकूड योजनेसाठी निधी मंजूर करुन आणला. पंचगंगा प्रदुषण, ड्रायपोर्ट, रेल्वे सुविधा, सीटी बससेवा असे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
मतदारसंघातील बहुतांशी गावांत विकासकामांच्या माध्यमातून मी पोहोचलो आहे.
सुळकूड नळपाणी योजनेसाठी केंद्राकडून 161 कोटींचा निधी आणला. जे माझ्यावर टिका करीत आहेत, त्यांचे या योजनेसाठी काय योगदान आहे, असा प्रश्न करत काम करणारी आम्ही माणसे आहोत. जरी या योजनेच्या कार्यवाहीत कांही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरीही मी सडेतोड भूमिका घेतली आहे. कांहीजणांना पाण्यावर राजकारण करायचे आहे. त्यांचा उद्देsश पाणी आणणे नाही. मुख्यमंत्री शिंदे हे या प्रश्नावर सकारात्मक असून इचलकरंजीला स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी शासनही कटीबध्द असणार आहे. मी इचलकरंजीला पाणी आणलो नाही, तर पुढची कोणतीच निवडणूक लढणार नाही.
राजकीय प्रगल्भता असणारे आवाडे कुटूंब आहे. महायुतीची उमेदवारी मला मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी मला सहकार्याची भूमिका घेतली. त्यांची इचलकरंजीसह परिसरात ताकद आहे. त्याचा नक्कीच मला फायदा होणार आहे. त्यांच्यासोबतच भाजपची वेगळी केडर आहे. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची बुथ लेव्हलपर्यंत फळी आहे. याशिवाय ग्रामीण भागात शिवसेना-भाजपासह मनसे, रयत क्रांती संघटना, आरपीआय, रासप, जनसुराज्य या घटक पक्षांचे जाळे आहे. त्यांचे बळ मला नक्कीच मिळणार आहे.
योगी आदित्यनाथ यांची मास्टर स्ट्रोक देणारी सभा झाली. एक झंझावात, एक ताकद नागरिकांत निर्माण झाली. लोक उत्स्फूर्तपणे योगींचे विचार समजून घेण्यासाठी आले होते. शाहूवाडीत आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. तेथील मंडळीही योगीच्या सभेला आली होती. मुळ इचलकरंजीकर जनता रस्त्यावर आली ती योगींना ऐकण्यासाठी. त्यामुळे इचलकरंजीत भगवी लाट तयार झाली आहे. त्याचा नक्कीच मोठा फायदा मला होणार आहे. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी शासन वेगळ्dया पद्धतीने प्रयत्न करत आहे. महामंडळांना वेगवेगळा निधी दिला जात आहे. या शासनाने सर्वाधिक ताकद मराठा समाजाला दिली आहे. त्यामुळे आपल्या उमेदवारीवर त्याचा सकारात्मकच परिमाण जाणवणार आहे.
पुढील पाच वर्षात जास्तीत जास्त उद्योग मतदारसंघात येतांना दिसतील. त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये शेतकऱ्यांच्या जमीन जाणार आहे, त्यातील कांही शेती परत दिली जाईल. त्याचा एनए केला जाईल. तो औद्योगिक भूखंड म्हणून विकसित केला जाईल. त्याला पायाभूत सुविधा पुरवल्या जातील.
त्यांने दिलेल्या जमिनीचे पैसे मिळतीलच, पण परत दिलेल्या जमिनीतूनही भरपूर लाभ मिळणार आहे. इको फ्रेंडली उद्योग मतदारसंघात कसे येतील, नैसर्गिक उद्योग कसे उभारता येतील, यावर भर राहणार आहे. टेक्स्टाईल हबवर भर देतोय. ड्रायपोर्टची संकल्पना आहे, ज्यातून मतदारसंघात आयात-निर्यात कशी होईल, यासाठी प्रयत्न असून हा मतदारसंघ औद्योगिकदृष्ट्या, कृषीदृष्ट्या सक्षम करणे या माझ्या वचनाला जागत मतदारसंघ एक नंबरला घेऊन जाण्याचे माझे ध्येय असेल.
Previous Articleमतदानाद्वारे प्रत्येकाने कर्तव्यपालन करावे
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.