जिल्हाधिकाऱयांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
काही गावांना स्मशानभूमी नाही. तर स्मशानभूमींना रस्ता नाही. त्यामुळे जिल्हय़ातील सर्व गावांना स्मशानभूमी उपलब्ध करण्यासाठी अधिकाऱयांनी पाऊल उचलावे, असे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अनुसूचित जाती-जमातीच्या जागृती समितीची बैठक घेऊन त्यांनी हा आदेश दिला आहे.
काही गावांत स्मशानभूमीसाठी जागा नाही. त्याठिकाणी खासगी जागा खरेदी करावी. त्यासाठी ग्राम पंचायत तसेच गावातील प्रमुखांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कोणीही आडकाठी आणू नये. खरेदीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगितले. स्मशानभूमी नसलेल्या गावांची यादी तयार करावी. तीन महिन्यांमध्ये तातडीने त्या ठिकाणी स्मशानभूमी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगण्यात आले.
स्मशानभूमी उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता करावा. संरक्षण भिंत, शेड उपलब्ध करावे. याचबरोबर शेगडीदेखील त्या ठिकाणी उपलब्ध करण्यासाठी अधिकाऱयांनी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्मशानभूमीच्या या सर्व कामांसाठी अनुदान उपलब्ध केले जाईल. मात्र त्यासाठी अधिकाऱयांनी तातडीने सर्वे करून एक आराखडा तयार करावा. त्यानुसार निधी उपलब्ध केला जाईल.
या बैठकीमध्ये तलाव परिसरामध्ये कोणतेही बांधकाम करू नये यावरही चर्चा झाली. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निकाल दिला आहे त्याचे पालन प्रत्येक ग्राम पंचयात, नगरपंचायत, तालुका पंचायत, नगरपालिका यांनी केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. किल्ला तसेच वनविभागामध्ये कोणत्याही महापुरुषांचे किंवा व्यक्तीचे पुतळेदेखील उभे करता येणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. आंबेडकर व वाल्मिकी विकास महामंडळे आहेत. त्या महामंडळाच्या आर्थिक स्थितीमध्य कशी वाढ होईल यासाठी अधिकाऱयांनी पाठपुरावा केला पाहिजे. त्यासाठी तातडीने पाऊल उचला, असे जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना सांगितले. या बैठकीला जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., महापालिका आयुक्त डॉ. रुदेश घाळी, पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, उमा सालीगौडर, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख नंदगावी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवताच आली जाग
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सौंदत्ती तालुक्मयातील एणगी गावच्या नागरिकांनी मृतदेह आणला होता. आम्हाला स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे आम्ही अंत्यविधी कोठे करू, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी आंदोलन छेडले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी तातडीने बैठक घेऊन स्मशानभूमी संदर्भातील सर्व अडथळे दूर करण्याची सूचना केली आहे.