सातारा प्रतिनिधी
फलटण तालुक्यात घडलेली घटना मणिपूरसारखी घडली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सातारा पोलीस ठाण्याचे अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे. फलटण तालुक्यातील कुरवली गावात एका विधवा महिलेसह तिच्या मुलीला कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्यानंतर त्यांनी एका व्हिडीओ द्वारे हे आवाहन केले आहे.
या व्हिडीओद्वारे बोलताना त्यांनी म्हटले आहे कि, “फलटण येथे कुरवली खुर्द या गावात 2 शाळकरी लहान मुलीं खेळत असताना वाद निर्माण होऊन दोन पालकांमध्ये वादावादी झाली होती. हा वाद विकोपाला जाऊन नंतर त्यांची भांडणे झाली.”
पुढे बोलताना त्यांनी “या घटनेनंतर पीडित मुलीला आणि महिलेला मारहाण झाली तसेच त्यांचा विनयभंग झाल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासामध्ये पुरावे समोर येतील. मणिपूर सारखी कोणतीही घटना घडली नसून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये” असे आवाहनही त्यांनी केले.