कै. प्रा. अनंत मनोहर यांच्या साहित्याचा धांडोळा घेणारा कार्यक्रम : सहभागी अभिवाचनकर्त्यांना प्रा. मनोहर यांच्या साहित्यकृतींची भेट
प्रतिनिधी /बेळगाव
काटेकोरपणाला मिश्किलतेची, लेखनाला अभ्यासाची व चर्चेला वेळेच्या मर्यादेची जोड देणारे प्रा. अनंत मनोहर यांनी उक्ती आणि कृती यामध्ये समान सूत्र ठेवले. त्यांच्या साहित्याचा धांडोळा घेणारा ‘मनोहर ः एक मेन्श माणूस’ हा कार्यक्रम रविवारी वरेरकर नाटय़ संघ येथे पार पडला. अनेक दिवसांनंतर झालेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्य ग्रंथालय, मंथन, सरस्वती वाचनालय, वरेरकर नाटय़ संघ व वाङ्मय चर्चा मंडळ या संस्थांनी केले होते.
या कार्यक्रमाचे लेखन, निवेदन व संकल्पना मेधा मराठे यांची होती. त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात करतानाच प्रथम ‘मेन्श’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला. ‘मेन्श’ हा ज्यू शब्द आहे. मेन्श म्हणजे जिगरबाज, जोश, कैफ, झिंग असलेले व्यक्तिमत्त्व. एका अर्थाने लेखकांच्या गर्दीत उठून दिसणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘मनोहर ः एक मेन्श माणूस’ होय, असे त्या म्हणाल्या. मनोहर यांचे बालपण, शिक्षकी पेशा, आरपीडीमध्ये त्यांची झालेली नियुक्ती आणि त्यांचे लेखन या सर्वांचा आढावा घेत त्यांच्या साहित्यातील काही प्रसंगांचे या कार्यक्रमात अभिवाचन करण्यात आले.
सृजनाची निर्मिती भाजल्याशिवाय होत नाहाr!
‘विळखा’ हा एक खुसखुशीत प्रसंग. ‘नारद’, ‘सी. डी. देशमुख’ आणि ‘सरदार पटेल’ हे वेश बदलून भूलोकावर फेरफटका मारतात आणि मुंबईतील जागा खरेदी, वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया आणि अनेक ठिकाणी चाललेले गैरव्यवहार पाहून पुन्हा आपला स्वर्गलोकच बरा म्हणून परततात, असा हा प्रसंग. ‘राब’ ही सरांची गाजलेली कादंबरी. कोकणामध्ये उन्हं तापत असताना ‘राब’ घातला जातो. म्हणजेच पालापाचोळा पसरून तो जाळला जातो; ज्यामुळे माती चांगली भाजली जाते व पीक तरारून येते. लेखक म्हणतात, माणसाचेही तसेच आहे. भाजणं त्याच्यासाठी आवश्यकच आहे, त्याशिवाय सृजनाची निर्मिती होत नाही.
‘सोयरी वनचरे’मध्ये सुगरण पक्ष्यांच्या माद्यांचा खुसखुशीत संवाद पाहायला मिळाला. त्यांच्या कथांचा आणि कादंबऱयांचा आढावाही घेतला गेला. ‘द्वारका विनाशा’साठी मनोहर यांनी किती अभ्यास केला होता, याचे प्रत्यंतर त्याच्या सादरीकरणातच दिसून आले. मनोहरांच्या पत्नी आशा या त्यांच्या पहिल्या वाचक आणि टीकाकारसुद्धा. सहजीवनाचा उत्तम नमुना म्हणून या दोघांकडे पाहता येईल, असे सांगताना मेधा मराठे यांनी या जीवनाचा एक हृद्य असा आढावा घेतला.
‘अरण्यकांड’, ‘थोडं वेगळं बोलायचंय’ यांचा आढावा सहभागी महिलांनी घेतला. इंदिरा संत आणि रामाणी यांच्याबद्दल मनोहर काय म्हणत होते, याचेही उत्कट वर्णन या कार्यक्रमात पाहायला मिळाले. ‘घर देता का घर?’ या सादरीकरणानंतर ‘विझवून दीप सारे, मी चाललो निजाया’ या बा. भ. बोरकर यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी उपस्थित मनोहर यांचे सुपुत्र विनय यांनी या कार्यक्रमाबद्दल आपले मत व्यक्त करताना
‘देखणी ती माणसे, ज्यांना निर्मितीचे डोळे,
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे’
असे अचूक वर्णन केले आणि कलाकारांबद्दल व बेळगावकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात मंजिरी रानडे, दीपा देशपांडे, श्रृती परांजपे, आरती आपटे, मेधा मराठे, विद्या देशपांडे, मौसमी भातकांडे व अर्चना ताम्हणकर यांचा सहभाग होता.
प्रारंभी नंदिनी दामले यांनी ईशस्तवन सादर केले. शोभा लोकुर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. अनघा वैद्य यांनी केले. स्वरुपा इनामदार, आशा कुलकर्णी, माधव कुंटे, अनिरुद्ध ठुसे, शोभा लोकुर, श्रीधर कुलकर्णी यांच्या हस्ते सहभागी महिलांना पुष्पगुच्छ देण्यात आला. विजया उरणकर यांनी आभार मानले. संगीत तंत्रसाहाय्य श्रीकृष्ण ताम्हणकर यांचे होते.
सर्व सहभागी अभिवाचनकर्त्यांना वीणा व विनय मनोहर यांच्या हस्ते मनोहर यांच्या साहित्यकृतींची भेट देण्यात आली.
त्यांना 360 नव्हे तर एकाही अंशातून मनोहर कळले नाहीत
अनंत मनोहर हे स्पष्टवक्ते होते. त्यामुळे त्यांच्या साहित्याबाबत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे ते निश्चितपणे देऊ शकले असते. परंतु, त्यांच्या साहित्यावर अभ्यास करण्यासाठी वारंवार त्यांच्या घरी जाऊनसुद्धा त्यांना विक्षिप्त म्हणणे, 360 अंशांतूनच नव्हे तर एकाही अंशातून त्यांना न जाणणे आणि मराठी भाषेच्या लवचिकतेचा फायदा घेऊन त्यांच्या साहित्याबद्दल न बोलता त्याला दुसरीच दिशा देणे व कुतूहलापोटी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना जातीयतेचा रंग देणे हा कृतघ्नपणा होता, अशा शब्दात मेधा मराठे यांनी मनोहर यांच्या साहित्याचा चुकीचा अर्थ काढणाऱयांचा खरपूस समाचार घेतला.