ऑनलाइन टीम / तरुण भारत :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांचा आंदोलनाचा 13 दिवस असून, त्यांनी अन्न-पाणी त्यागण्याचा इशारा दिला आहे. अशातच कुणबी सेनेचे राज्याचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी जरांगे पाटलांचे आंदोलन बेकायदेशीर असून, त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
विश्वनाथ पाटील यांनी पत्रात म्हटलं की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास कुणबी समाजाचा विरोध नाही. मात्र, मराठा समजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास ओबीसीमध्ये असलेल्या 370 हून अधिक जातींवर हा अन्याय असेल. मनोज जरांगे पाटील सरकारवर दबाव टाकून राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण करत आहेत. त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. त्यांना उपोषणावरुन उठवावे. त्यांच्या सनदशीर आणि लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाला आमचा विरोध नाही.
जरांगे पाटील यांच्याकडे कोणताही दस्तावेज नसताना वंशावळीची अट रद्द करण्याची त्यांची मागणी भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करणारी आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.