भारतातील कानपूर शहरातील आयआयटी च्या संशोधकांनी कृत्रिम हृदयाची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. या हृदयाचे प्रयोग आता प्राण्यांवर केले जाणार आहेत. हे प्रयोग यशस्वी झाले तर भविष्यकाळात मानवावरही ते केले जाण्याची शक्यता आहे. अर्थात यासाठीं बरीच वर्षे लागणार आहेत. या कृत्रिम हृदयामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कारणे अतिशय सुलभ होणार आहे. कानपूर आयआयटीच्या 118 व्या स्थापना दिनी या हृदयाचे प्रदर्शन करण्यात आले.
प्राध्यापक अभय करंदीकर यांच्या नेतृत्वात 10 डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सच्या एका संशोधन गटाने या हृदयाची निर्मिती केली. कृत्रिम हृदयाचा उपयोग शरीराच्या प्रत्येक अवयवाला रक्ताचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा करणे, हा असल्याचे अभय करंदीकर यांनी स्पष्ट केले. सजीवाचे नैसर्गिक हृदय व्याधीग्रस्त झाल्यास रक्तपुरवठय़ात अडथळा येतो. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला रक्तपुरवठा नीटपणे होत नाही. अशावेळी कृत्रिम हृदयाचा उपयोग होतो. या हृदयाचे प्रत्यारोपणही व्यवस्थितपणे करता येते हे याचे वैशिष्टय़ आहे.
कानपूर आयआयटीने अशी अनेक उपकरणे निर्माण केली आहेत, जी भारताला विदेशातून तिप्पट चौपट किंमत देऊन आणावी लागतात. अमेरिकेतून 12 लाख रुपये किमतीचे व्हेंटिलेटर्स आणावे लागतात. या आयात व्हेंटिलेटर्स इतकेच प्रभावी आणि सक्षम व्हेंटिलेटर्स कानपूर आयआयटीने निर्माण केले आहेत. मात्र त्यांची किंमत अडीच ते तीन लाख रुपये आहे. याशिवाय इतर अनेक इंजिनिअरींग आणि वैद्यकीय उपकरणे या महाविद्यालयातील संशोधकांनी निर्माण केली आहेत.