Raju Shetti News : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी एकजूट केली आहे.’इंडिया’ अस विरोधकांच्या या आघाडीचं नाव आहे. दुसरीकडे आता राज्यात प्रागतिक विकास मंच एकवटले आहेत. या मंचची बैठक लवकरच कोल्हापुरात होणार असल्य़ाची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. या बैठकित आगामी निवडणुकांबाबत स्पष्ट असे धोरण निश्चित होण्याची शक्यता आहे. प्रस्थापित पक्ष छोट्या पक्षांना जुमानत नसल्याने अनेक छोटे पक्ष एकत्र येऊन राज्यात छोट्या पक्षांची नवी आघाडी तयार झाली असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या छोट्या पक्षांनी एकत्र येत प्रागतिक विकास मंचची स्थापना केली आहे. हा मंच आता स्थापन झाला नाही. तर या मंचने महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार स्थापन होण्यासाठी देखील पुढाकार घेतला होता.स्वाभिमानी पक्षासह, शेकाप,कम्युनिस्ट पक्ष,स्वराज्य पक्ष,आम आदमी पार्टी,सीपीआय, लाल निशाण पक्ष, बहुजन विकास आघाडी, समजावादी पार्टी,जनता दल,सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष,भाकप,माकप हे 13 डावे पक्ष प्रागतिक विकास मंचचे घटक पक्ष आहेत. आम्ही नेहमीच एकत्र येत विविध सामाजिक प्रश्नावर चर्चा करतो. सरकारच्या धोरणाची चिकित्सा करत असतो. पुण्यात दोन दिवसांची कार्यशाळा नुकतीच पार पडली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील निर्णय घेणार आहोत. लवकरच कोल्हापुरला ही बैठक होणार असल्याचे यावेळी राजू शेट्टी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्ता स्थापन करताना आमच्यातील काहींनी शेतकऱ्यांसह वंचितांचे प्रश्न सुटतील यासाठी सहकार्याची भूमिका घेतली. मात्र, वेळोवेळी पाठपुरावा करून देखील ठोस निर्णय झाला नाही. सत्ता स्थापन झाल्यानंतर मात्र घटक पक्षांना डावलल्याने आता ते याची किंमत मोजायला लावतील असा इशारा शेट्टी यांनी दिला.