भाजपसाठी राष्ट्रीय गांभीर्याचा विषय : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची काँग्रेसवर टीका
- मतदार विश्वास ठेवत नसल्याने विरोधकांचा जळफळाट
- समाजात गैरसमज पसरविण्याचे विरोधकांचे खुजे प्रयत्न
- पंतप्रधान मोदींकडून गोव्याच्या विकासाची पुन्हा ग्वाही
- ‘मोदी की गॅरंटी’, तर काँग्रेसचा जाहीरनामा निव्वळ धार्मिक
- श्रीपादभाऊंना लाखाचे, पल्लवींना 40 हजारांचे मताधिक्क्य मिळणार
पणजी : कर्नाटकाने पाण्यासाठी म्हादईची वाट अडविली असली तरी आम्ही त्यावर योग्य मार्ग काढू, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. म्हादई हा काँग्रेससाठी राजकारणाचा विषय असला तरी आमच्यासाठी तो राष्ट्रीय गांभीर्याचा विषय आहे. म्हादई आमची जीवनदायिनी आहे. त्यामुळे या विषयाचा सतत पाठपुरावा करण्यात आला असून यापुढेही करण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत तिचे पाणी वळविण्यास देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले. लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा आणि पुढील रणनीती ठरविण्यासाठी मंगळवारी पणजीत झालेल्या भाजप आणि मित्रपक्षांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री रवी नाईक, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, आमदार आलेक्स लॉरेन्स, डॉ. चंद्रकांत शेट्यो, अँथनी वाझ, जीत आरोलकर यांची त्यावेळी उपस्थिती होती.
विरोधकांचा जळफळाट
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही विरोधक म्हादई, राजभाषा यासारखे विषय उपस्थित करून आपल्या पद्धतीने सरकारला अडचणीत आणण्याचे आणि लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे प्रयत्न करतात, परंतु त्यांचे ते प्रयत्न खुजे ठरत आहेत. या नेत्यांची मानसिकता लोक ओळखून आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुणीच विश्वास ठेवत नसल्याने त्यांचा जळफळाट होत आहे. लोक सदाकाळ फसत नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
विकासकामे दिसत नाहीत, हा खलपांचा दृष्टीदोष!
राज्यात एवढा विकास आणि विकासकामे झालेली असतानाही अॅड. खलप यांच्यासारखे नेते नन्नाचाच पाढा वाचत आहेत, हा त्यांच्या डोळ्यांचा दोष आहे. त्याला कुणीही काहीच करू शकत नाही, अशी टीकाही अन्य एका प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी केली. महिला विधेयक मांडल्याचे श्रेय घेणारे खलप एवढी वर्षे कुठे होते. 1996 पासून आतापर्यंत ते विधेयक मंजूर करून घेण्यासाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न का केले नाहीत, असे सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले.
एसटी आरक्षणाचा निर्णय यापूर्वीच
राज्यातील मच्छीमार बांधवांच्या सीआरझेडमध्ये येणाऱ्या घरांना पूर्ण संरक्षण दिले जाईल. ओसीआय मुद्द्यावर केंद्राने तोडगा काढल्याने येथील गोमंतकीयांच्या जमिनी सुरक्षित राहणार आहे. तसेच एसटी बांधवांना राजकीय आरक्षण देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.
पंतप्रधानांकडून पुन्हा गोवा विकासाची ग्वाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्याशी भावनिक नाते असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे केंद्राकडून गोव्याला विशेष वागणूक दिली जात आहे. म्हणूनच विकासकामांसाठी गोव्याला काहीच कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधानांनी जाहीरपणे दिली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाजपचा जाहीरनामा हा ‘मोदी की गॅरंटी’
वारसा कर सारखी आश्वासने देणारा काँग्रेसचा जाहीरनामा हा निव्वळ धार्मिक आहे, असा आरोप करताना डॉ. सावंत यांनी, भाजपच्या जाहीरनाम्यातील आश्वासने ही ‘मोदी की गॅरंटी’ असल्याने पूर्ण केली जाणार आहेत, असे आश्वासन दिले. राज्यात दि. 7 मे रोजी होणारे मतदान शांततेत पार पडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खाणी बंद पडण्यास काँग्रेसच जबाबदार : ढवळीकर
यावेळी बोलताना मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विरोधी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. म्हादईप्रश्नी कर्नाटकला पहिले पत्र कोणी दिले? 2008 साली सर्व मर्यादांचे उल्लंघन करुन 62 दशलक्ष टन खनिज उत्खनन कोणी केले? त्यावेळी कोणते मंत्री खाण व्यवसायात होते? रेल्वे दुपदरीकरणाचा डीपीआर 2012 पूर्वी काढण्यात आला तेव्हा एनडीएचे सरकार होते की यूपीएचे? या प्रश्नांची उत्तरे विरोधकांनी शोधावी, असे आव्हान दिले. राज्यातील खाण व्यवसाय बंद पडण्यास काँग्रेसच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
श्रीपादभाऊंना एक लाख, पल्लवींना 40 हजारांचे मताधिक्क्य
यावेळी बोलताना ढवळीकर यांनी उत्तरेत श्रीपाद नाईक हे एक लाखाच्या मताधिक्क्याने तर दक्षिणेत पल्लवी धेंपे 40 हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळवून विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.