केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल यांची सावध प्रतिक्रिया; भाजपचे निवडणूक निरीक्षक म्हणून कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेनेचे खासदार असणाऱ्या राज्यातील लोकसभा मतदार संघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचबरोबर यापूर्वी लढून पराभव पत्करावा लागलेल्या लोकसभा मतदार संघांवर भाजपचे लक्ष असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी इचलकरंजी दौऱ्यावर असताना सांगितले होते. त्यांच्या विधानाला पुष्टी देणारे वक्तव्य केंद्रीय विधि व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री बघेल भाजपचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले. त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचल्या आहेत काय? हे पाहण्यासाठी आम्ही पक्षाच्या वतीने माहिती घेण्यासाठी दौरा करत आहोत. यासंदर्भात पक्षातील निरीक्षकांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पत्रकारांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघ भाजप लढविणार काय? असा प्रश्न विचारला असता मंत्री बघेल म्हणाले, राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी असणारी राजकीय स्थिती, वातावरण आणि केंद्र सरकारच्या जनतेपर्यंत पोहचलेल्या योजनांची माहिती आम्ही घेत आहोत. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघात भाजप लढू शकते. पक्ष नेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे, असे सांगितले.
खासदार महाडिक यांनी केले. बघेल यांचे स्वागत
दरम्यान, केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल सोमवारी विमानाने कोल्हापुरात आगमन झाले. जिल्हा भाजपतर्फे खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, विजय जाधव आदी उपस्थित होते.