सचिन भादुले, विटा
Anil Babar News : डॉक्टर तुमच्या हातातील स्टेथेस्कोप कदाचित हृदयाचे ठोके मोजू शकतो.मात्र त्यामागील मनाच्या भावना जाणवून घ्यायच्या असतील तर मन संवेदनशील असावे लागते. अधिकारी सह्यदयाचे असतील तर जिल्ह्याचे आरोग्य चांगले राहिल.डॉ. विक्रमसिंह कदम तुम्ही सिव्हील सर्जन झालात तरी लेंगरे आणि परिसरातील सर्वसामान्य लोक तुम्हाला बंडू डॉक्टर म्हणून ओळखतात.त्यामुळे तुमच्यातील बंडू डॉक्टर जागा ठेवा,अशा शब्दात आमदार अनिल बाबर यांनी संवेदनशील अधिकाऱ्यांचे किस्से सभागृहाला ऐकवताना पोस्टमार्टम रूम उभारणीचा मन हेलावणारा प्रसंग कथन केला.
कोणतीही गोष्ट उभा करताना त्यामागे काहीतरी घटना मनावर आघात करून गेलेली असते.असेच काहीसे घडले आणि विट्यात मृतांचे पोस्टमार्टम होण्याची सुरूवात झाली.विद्यमान आमदार अनिल बाबर त्यावेळी जिल्ह्याचे आरोग्य सभापती होते.ही त्यावेळची गोष्ट आहे,ज्यावेळी कडेगांव आणि खानापूर तालुका एक होता.शाळगाव येथे एका इसमाचे आकस्मिक निधन झाले.कडेगांव पोलिसांनी पोस्टमार्टम करण्याची गरज व्यक्त केली.त्यावेळी विट्याला पोस्टमार्टमची सोय नव्हती.बैलगाडीने मृतदेह कुंडल येथे नेण्यात आला.मात्र त्या ठिकाणी देखिल त्यावेळी विजेची सोय नसल्याने पोस्टमार्टम होणार नाही,असे सांगण्यात आले.मग मृतदेह तसाच बैलगाडीने सांगली येथील सिव्हील हॉस्पिटल येथे हलवण्यात आला.
मात्र त्यावेळचे सिव्हील सर्जन सामान्य लोकांना उपलब्ध होत नव्हते.आरोग्य सभापती असूनही बाबर यांना त्यांनी भेट नाकारली.बाबर यांनी मग जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पाचारण केले.त्यांनी सिव्हील सर्जन यांची भेट घेऊन घटनेचे गांभिर्य सांगीतले आणि पोस्टमार्टम पार पडले. मात्र मृतदेह बैलगाडीने आणलेला होता.पुन्हा माघारी बैलगाडीने शाळगांव गाठेपर्यंत नातेवाईक ताटकळत ठेवणे माणुसकीला धरून नव्हते.त्यामुळे बाबर यांनी तत्कालीन सिव्हील सर्जन यांना रूग्णवाहिका अर्थात अॅम्ब्युलन्स देण्याची मागणी केली. मात्र ते देखिल शक्य झाले नाही.
बाबर यांनी सांगलीचे तत्कालीन नगराध्यक्ष राजाभाऊ जगदाळे यांची थेट भेट घेतली.त्यांना घडलेली घटना सांगून सागंली नगरपालिकेची अॅम्ब्युलन्स देण्याची विनंती केली.जगदाळे यांनी तत्कालीन मुख्याधिकारी यांना याबाबत सुचना केली.मात्र मुख्याधिकारी यांनी नगरपालिकेची रूग्णवाहिका सांगली बाहेर देता येणार नाही,असे सांगीतले.मग जगदाळे आणि बाबर यांनी त्यांना अडचण आल्यास आम्ही जबाबदार आहोत. मुख्यमंत्री वसंतदादांना सांगून तुम्हाला अडचण येऊ देणार नाही, असे आश्वस्त केल्यानंतर अॅम्ब्युलन्स मिळाली आणि मृतदेह शाळगांवकडे रवाना झाला.
आपल्या भागातील लोकांची होणारी ही परवड अनिल बाबर यांच्या मनावर आघात करून गेली. बाबर यांनी तातडीने पावले उचलीत विट्यातील कराड रस्त्यावर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन खोल्या बांधल्या. त्यासाठी तांत्रीक बाबी न पाहता थेट शेष फंडातील निधी वापरला आणि खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले. त्यानंतर आरोग्य विभागाकडे पोस्टमार्टम रूमसाठी प्रस्ताव सादर केला. त्याचा पाठपुरावा सुरू झाला.
त्या काळात आरोग्य विभागाचे सचिव जोसेफ म्हणून होते. त्यांनी तुमच्या तालुक्यात मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे सांगत मंजूरी देण्यास नकार दिला. त्यावर बाबर यांनी ‘मला प्रस्ताव द्या, मी मतदारसंघात जातो आणि मृत्यूचे प्रमाण वाढवून प्रस्ताव आणतो’ असे उपहासाने सांगीतले. त्यानंतर जोसेफ यांना त्याचे गांभिर्य लक्षात आले. त्यांनी तातडीने उपसचिवांसह अधिकाऱ्यांची बैठक लावली आणि शवविच्छेदन गृह अर्थात पोस्टमार्टम रूमला परवानगी दिली. यावेळी त्यांनी मी तांत्रीक बाबींचा विचार करत नाही, तर ज्या तळमळीने आणि माणूसकीच्या भावनेने हा प्रस्ताव घेऊन सदस्य आलेत, त्याचा विचार करून परवानगी देत असल्याचे जोसेफ म्हणाल्याचे आमदार बाबर यांनी आवर्जून सांगितले.
हे सर्व सांगताना आमदार बाबर यांनी नविन आरोग्य अधिकाऱ्यांना सहृदयतेने काम केल्यास जिल्ह्याचे आरोग्य कसे चांगले राहिल, याचा वस्तुपाठ दिला. अनेक लोक आमच्याकडे येतात. तुमच्यापेक्षा आमची ओपीडी मोठी आहे. पण आमच्या ओपीडीत जमिनीपासून, कौटुंबीक समस्यांपर्यंत आणि पोलिस ठाण्यापासून तहसिल कार्यालयापर्यंतचे पेशंट असतात. त्यामुळे प्रत्येक माणूस माझ्यापर्यंत पोहचेल आणि मग मी तुम्हाला फोन करेन असे होणार नाही. तुम्ही संवेदनशील मनाने काम केले तर जिल्ह्याचे आरोग्य चांगले राहिल, असे सांगताना आमदार बाबर यांनी सांगितलेल्या घटनेने उपस्थितांच्या अंगावर देखिल क्षणभर रोमांच उभा राहिले नसते, तरच नवल..!
तुमच्यातील बंडु डॉक्टर जागा ठेवा
डॉ. विक्रमसिंह कदम तुम्ही सिव्हील सर्जन झालात तरी लेंगरे आणि परिसरातील सर्वसामान्य लोक तुम्हाला बंडू डॉक्टर म्हणून ओळखतात. सामान्य माणूस देखिल तुम्हाला फोन करून ताप – थंडीसाठी गोळी विचारतो. तुम्ही त्यांची सेवा केल्यामुळे पुण्याई तुमच्या मागे उभा राहिली. मी तुमच्यामागे उभा राहिलोच. पण ही पुण्याई कायम तुमच्याबरोबर राहणार आहे. त्यामुळे तुमच्यातील बंडू डॉक्टर जागा ठेवा, अशा शब्दात आमदार बाबर यांनी विक्रमसिंह कदम यांना संवेदनशील काम करण्याचा सल्ला दिला.