कसबा बीड, प्रतिनिधी
Kolhapur : कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाने परिपुर्ण होण्यासाठी रयत सेवा कृषी उद्योग संघाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे प्रतिपादन नुतन चेअरमन सचिन विश्वास पाटील यांनी केले. करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील समस्त धनगर समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारतीय सैन्य दलातील निवृत्त सुभेदार मेजर होते.
रयत संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध होवून चेअरमनपदी सचिन पाटील व संचालकपदी दत्तात्रय हराळे यांची निवड करण्यात आली. याबद्दल सावरवाडी धनगर समाजाच्यावतीने आयोजित सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत चेअरमन पाटील म्हणाले, रयत संघाचे दर्जेदार व गुणवत्तापुर्ण बैलजोडी छाप हातमिश्र खत जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. रयतच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदाव गुणवत्तापुर्ण खते पुरवठा करतानाच अधिकाधिक उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी गावागावतील शेतकऱ्यांनी एकत्र येवून याचा लाभ घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले.
स्वागत व प्रास्ताविक बाबूराव रानगे यांनी केले. त्यानंतर चेअरमन पाटील यांचा सत्कार हराळे यांच्या हस्ते तर संचालक हराळे यांचा सत्कार सिध्द रानगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पार्थ पाटील, आनंदा लांडगे, ईश्वरा रानगे, देवाप्पा रानगे, चंद्रकांत रानगे, बापू हराळे, हिंदूराव गावडे,पांडूरंग रानगे, राजू हराळे, महादेव हराळे उपस्थित होते.