जांबोटी वनखात्याच्या कार्यालयावर मोर्चाचा इशारा
वार्ताहर /जांबोटी
गेल्या दोन-तीन महिन्यापासून ओलमणी गावात वानरांच्या कळपाने धुमाकूळ घातला असून त्यांच्याकडून घरांच्या छपरावरील कौले तसेच फळझाडे, परिसरातील भाजीपाला आदींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. वनखात्याने या वानरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
ओलमणी गावामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यापासून मोठय़ा प्रमाणात वानरांचा धुमाकूळ सुरू असल्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. सदर वानरांचा कळप दिवसभर गावात अक्षरशः धुमाकूळ घालत असून, त्यांच्या मर्कटलीलांमुळे नागरिक वैतागून गेले आहेत. सदर वानर घराच्या छपरावर चढून या घरावरून त्या घरावर बिनधास्तपणे उडय़ा मारत असल्यामुळे छपरावरील कौलांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान होत आहे. याकडे साफ दुर्लक्ष झल्यामुळे नागरिकांनी जांबोटी वनखात्याच्या कार्यालयावरच मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
पकडून जंगलात सोडण्याची मागणी
या वानरांच्या मर्कटलीलांमुळे ओलमनी गावातील नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत. वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गावातील नागरिकांनी वन खात्याकडे अनेकवेळा केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वनखात्याने त्यांना सापळा लावून पकडून वानरांना दूर जंगलात नेऊन सोडावे. अन्यथा जांबोटी वन कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ओलमणी गावातील नागरिकांनी दिला आहे.