राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 6 वर्षांपूर्वी बिहारमध्ये संपर्ण दारूबंदी लागू केली होती. तरीही बिहारमध्ये उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान यासारख्या मोठय़ा राज्यांच्या तुलनेत अधिक संख्येत मद्यपी आहेत. यासंबंधीचा खुलासा केंद्र सरकारच्या नॅशनल फॅमिली अँड हेल्थ सर्व्हेद्वारे झाला आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केला आहे.
बिहारमध्ये एकूण 15.4 टक्के पुरुष मद्यपान करतात. तर तेथील शहरांमध्ये 13.9 टक्के आणि ग्रामीण भागात हे प्रमाण 15.8 टक्के इतके आहे. राज्यात मागील 6 वर्षांपासून दारूबंदी असताना तेथे ही स्थिती आहे. देशात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तरप्रदेशच्या ग्रामीण भागात 15 टक्के पुरुष मद्यपान करतात. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांमध्ये हे प्रमाण 13.1 टक्के तर शहरी भागात 14.7 टक्के इतके आहे.
अरुणाचलमध्ये सर्वाधिक प्रमाण
या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार मद्यप्राशनप्रकरणी देशभरात अरुणाचलचे लोक आघाडीवर आहेत. अरुणाचलमधील 52.6 टक्के लोकसंख्या मद्यपान करते. तेलंगणात हेच प्रमाण 43.4 टक्के इतके आहे. ईशान्येतील नागालँड देखील मद्यपानात आघाडीवर आहे. तेथील 39.9 टक्के लोकसंख्या मद्यपान करते. तर मणिपूरमधील 37.2 टक्के लोकसंख्या मद्यपान करत आहे.
अरुणाचलमधील महिलाही आघाडीवर मद्यपानाप्रकरणी अरुणाचलमधील महिलाच आघाडीवर आहेत. सर्वेक्षणानुसार तेथील 24.2 टक्के महिला मद्यपान करत आहेत. महिलांमध्ये दुसरे स्थान सिक्कीमचे आहे. तेथील 16.2 टक्के मद्यपान करतात. आसामममध्ये 7.3 टक्के तर तेलंगणात 6.7 टक्के महिला मद्यपान करतात.