ठिकठिकाणी खड्डे : वाहन चालकांना कराव्या लागतात जीवघेण्या कसरती
प्रतिनिधी /मोरजी
मोरजी पंचायत क्षेत्रातील दाभोळकरवाडा ते गावडेवाडा किनारी भागात जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे. अरुंद रस्त्यावर आता कुणी तरी गेल्या सहा महिन्यांपूर्वी कवाथे लावून अडथळा निर्माण केलेला आहे. हा रस्ता सार्वजनिक आहे की खासगी आहे? याचा खुलासा सार्वजनिक बांधकाम खात्याने करावा, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
मोरजी पंचायत क्षेत्रातील दाभोळकरवाडा ते गावडेवाडापर्यंत जाण्यासाठी पूर्वी रस्ता नव्हता. गुडघाभर पाण्यामधून वाट काढत ग्रामस्थांना नियोजित स्थळ गाठावे लागायचे. याची गंभीर दखल घेऊन तत्कालीन सरपंच सतीश शेटगावकर यांची निवड झाली आणि त्यांनी लगेच आपण जमीन व्यवहार जमीनदारांशी चर्चा करून रस्ता करून घेतला. सुरुवातीला तीन मीटर रस्ता करण्यात आला आणि त्या रस्त्यासाठी ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत, त्या जमीनदारांना आजपर्यंत एकही पैसा मिळालेला नाही. हा रस्ता झाल्यानंतर किनारी भागात मोठय़ा प्रमाणात झपाटय़ाने विकास होत गेला. अरुंद असलेल्या रस्त्यावरून मोठी अवजड वाहनेही जाऊ लागली. आणि त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे रस्त्याला पडलेले आहेत. हे चित्र पावसाळय़ात पूर्णपणे दिसत आहे. सहा महिन्यांपूर्वी हॉटेला परवानगी मिळविण्यासाठी एका जमीनदाराने तो रस्ता सहा मीटर रुंद केला करण्याचा एका जमीनदाराने जबाबदारी घेतली. परंतु काही दिवसांनी या रस्त्याच्या बाजूलाच एका कुळ मालकाने कवाथे लावले आणि रस्त्याला अडथळे निर्माण केले.
साबांखाच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष!
रस्त्याची चाळण होऊनही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. सरकारने या रस्त्याची पूर्णपणे चौकशी करायला हवी. ज्या पद्धतीने 3 मीटर असलेला रस्ता सहा मीटर करण्यात आला. तो रस्ता कायदेशीर होता की बेकायदेशीर होता, की सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा रस्ता सहा मीटरचा दाखवण्यात आला, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पुढे येत आहे.
मोरजी गावडेवाडा रस्त्यावर कवाथे ? मुख्य रस्ता ते गावडेवाडा रस्ता किनारी भागात जाणारा अरुंद रस्ता रुंद करण्यासाठी आवश्यक ती जागा जमीनदाराने दिली. त्यानुसार हा रस्ता रुंदीकरण केला. गेल्या तीस वर्षांपूर्वी तत्कालीन सरपंच सतीश शेटगावकर आणि स्थानिक पंच विनायक हरमलकर यांच्या कारकिर्दीत हा रस्ता अशक्मय होता तो केला आणि या परिसरातील किनारी भागाला मोठे महत्त्व आले आहे. दीड वर्षापूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी जमीनदार समीर लाड यांनी संबधित जमीन मालकांकडे चर्चा करून आणि पदरमोड करून रस्ता रुंदीकरण केला. आता या रस्ता रुंदीकरण केलेल्या मधोमध कवाथे लावल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे हा विषय मोरजी विकास समितीच्या बैठकीत चर्चेला आला होता त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नाही, त्यावेळी या रस्त्याचा विषय सोडवण्याची मागणी झाली .