ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी सकाळी मतदान केलं. यामध्ये खा. संभाजीराजे छत्रपती यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदान केल्यांनतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, बराच विचार करून मी मतदान केले. मतदान करताना मी ३० सेकंद थांबलो आणि त्यांनतर मग मी मतदान केले. तसेच खासदार संभाजीराजे यांनी त्यांचा खासदारकीचा कार्यकाळ ३ मेला संपणार आहे, त्यांनतर त्यांची काय दिशा असणार आहे, यावरही त्यांनी महत्वपूर्ण भाष्य केले.
मराठा समाजाच्या आंदोलनावेळी कोल्हापूरच्या राजांच्या डोळ्यातून अश्रू निघाले होते. त्या अश्रूंचा वचपा कोल्हापूरकर काढतील, असे भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले होते. त्यावर बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे माझ्या सोशल गोष्टीवर कोण कसे भाष्य करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे कोणी काय बोलावे, यावर मी काहीही सांगणार नाही. कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. तसेच मी जे काही काम करत असतो ते प्रामाणिक पणाने करत असतो, असे ते म्हणाले.
३ मे नंतर माझी दिशा वेगळी
पुढे बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले, “तीन मेपर्यंत माझा खासदारकीचा काळ आहे. त्यानंतर मी माझी दिशा जाहिर करणार आहे त्यानंतर निश्चित माझी वेगळी दिशा असणार आहे”. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती ३ मे रोजी खादारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.