ऑनलाईन टीम / तरुण भारत :
आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांची शासकीय महापुजा सुरू असतानाही आता मुखदर्शन घेता येणार आहे. वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री पहाटे अडीच वाजता पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात पूजेला येत असतात आणि जवळपास पहाटे पाचपर्यंत विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा आणि सत्कार कार्यक्रम मंदिरात होत असतात. त्यामुळे दरवर्षी या शासकीय महापूजेच्या चार तास आगोदर विठ्ठल मंदिरातील दर्शनाची रांग बंद केली जायची. परिणामी वारकऱयांची मोठी गैरसोय व्हायची. मात्र, यंदा वारकऱ्यांची ही गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असताना देखील मुखदर्शन सुरू ठेवण्यात येणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी रात्री उशिरा यासंदर्भात बैठक घेतली. त्या बैठकीत मंदिर प्रशासनाला यासंदर्भात आदेश देण्यात आले. या निर्णयामुळे जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे मुखदर्शन होणार आहे.
आषाढी एकादशी दिवशी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन मिळावे यासाठी भाविक 30-30 तास दर्शन रांगेत उभारलेले असतात. त्याचवेळी राज्यभरातील मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी आणि त्यांचे कार्यकर्ते व्हीआयपी बनून दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. त्यामुळे रांगेतील शेकडो भाविकांना या पवित्र दिवशी दर्शनापासून मुकावे लागते. हे सर्व जाणून शिंदे-फडणवीस सरकारने मुखदर्शन सुरू ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.