स्मशानभूमीत अडथळा-दुर्गंधी, मनपाने इतरत्र वाहने पार्किंग करण्याची मागणी
बेळगाव : सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये महानगरपालिकेची वाहने नेहमीच पार्किंग केली जात आहेत. मात्र यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. तसेच अडचण निर्माण होत असून महानगरपालिकेने स्वत:च्याच जागेत पार्किंग करावीत, अशी मागणी वारंवार होत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदाशिवनगर येथे महानगरपालिकेचे वाहने पार्किंग करण्यासाठी तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी गोडावून करण्यात आले आहे. मात्र वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी वाहने पार्किंग करणे अशक्य झाले आहे. परिणामी ही वाहने स्मशानभूमीच्या खुल्या जागेमध्ये पार्किंग केली जात आहेत. मात्र यामुळे स्मशानभूमीमध्ये अडथळा निर्माण होत आहे. तेंव्हा तातडीने ही वाहने हटवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. शहरातील कचरा उचल करण्यासाठी तसेच इतर खोदाईसाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात वाहने खरेदी केली आहेत. मनपाच्या अनेक खुल्या जागा आहेत. त्या ठिकाणी ती वाहने पार्किंग करण्याची सोय केली पाहिजे. मात्र स्मशानभूमीमध्ये वाहने पार्किंग करून साऱ्यांनाच त्याचा त्रास होताना दिसत आहे. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा देखील झाली. वाहने पार्किंग करू नये, असे सांगण्यात आले. तरीदेखील वाहने पार्किंग करण्यात येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून महापालिकेने सोय करून ती वाहने इतरत्र पार्किंग करावी, अशी मागणी जोर धरत आहे.