सांगरुळ; करवीर तालुक्यातील स्वयंभूवाडी येथील स्वयंभू नागपंचमी यात्रा मंगळवारी होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्शभूमीवर गेली दोन वर्ष यात्रा रद्द करण्यात आली होती. यात्रेनिमित्त गेली आठवडाभर सर्व उपाययोजना व तयारी सुरू आहे. तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सरपंच सदाशिव बाटे यांनी दैनिक तरुण भारतशी बोलताना सांगितले.
करवीर तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या स्वयंभूवाडी येथे श्री स्वयंभू हे एक प्राचीन जागृत देवस्थान आहे. जिल्ह्यासह करवीर, पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा तालुक्यातील लाखो भाविकांचे ते श्रद्रधास्थान आहे. दरवर्षी येथे नागपंचमी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण गेली दोन वर्ष कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती. राज्यशासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध उठवल्याने या वर्षी नागपंचमी यात्रा मोठ्या भक्कीभावात मंगळवारी संपन्न होणार आहे. यात्रेनिमित्त परंपरेनुसार होणारी विधिवत पूजा सरपंच बाटे यांच्या हस्ते होणार आहे.
स्वयंभू चरणी नतमस्तक होण्यासाठी यात्रेदिवशी लाखो भाविक येत असतात. या पार्श्वभूमीवर बोलोली ग्रामपंचायकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिराची स्वच्छता करण्यात आली असून यात्रेला येणाऱ्या भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे यासाठी दर्शन मंडप व लाईन याची व्यवस्था केली जात आहे. तसेच लाईट व्यवस्था, भाविकांची वाहने पार्कींग व्यवस्था केली जात आहे. कायद व सुव्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेची तयारी सुरू असुन येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे, असे सरपंच सदशिव बाटे यांनी सांगितले.