बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाला वाढणाऱ्या विरोधावर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने स्थानिकांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. बारसूवरील आंदोलनवर दडपशाहीचा वापर न करता माणुसकिच्या नात्याने हे सर्व हाताळाव असाही सल्ला त्यांनी केला. तसेच रोजगाराचा विचार करताना स्थानिकांचाही विचार करावा यामध्ये त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहीजे अशी भुमिका उद्धव ठाकरे यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार प्रत्येकाने संविधानाने दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करण्यात यावा. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन यावर चर्चा केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष विकासाच्या आड कधीच आला नाही. पण विकास साधत आसताना पर्यावरणाचा ऱ्हास कधीच होणार नाही याची काऴजी घेतली पाहीजे.” असे ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले, “स्थानिकांचे जे काही प्रश्न काय आहेत ते समजावून घेतले पाहीजेत. एन्रॉन प्रकल्पालाही विरोध झाला पण त्यानंतर शरद पवारसाहेबांनी संवादातून मार्ग काढला. समृद्धी मार्गालाही बराच विरोध झाला पण लोकांशी साधलेल्या संवादातून तो मार्गी लागला.”
“रत्नागिरीच्या बारसू भागात कातळ आहे तिथे कोणत्याही प्रकाऱची झाडे येऊ शकत नाहीत. त्यामुळे ती जागा योग्य आहे असे तज्ञांचे मत आहे. तरीही कोकणच्या पर्यावरणला कोणतीही हानी पोहोचवू न देता त्यातून मार्ग काढावा. लोकांना विश्वासात घ्यावे अशी लोकांची आपेक्षा आहे.”