लोकं म्हणतात की मला अजित पवार यांची जागा घ्यायची आहे. पण मला कोणाची जागा घ्यायची नसून जनताच असा विचार करणाऱ्या प्रतिगामी विचारांच्या लोकांना आपली जागा दाखवेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष हा विचार आहे तो फुटू शकत नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर आज प्रथमच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूरातील दसरा चौकात सभा होत आहे. या सभेच्या व्यासपीठावरून जनसमुदायाला संबोधित करताना रोहीत पवार म्हणाले, “कोल्हापूरातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांना माझा नमस्कार. कोल्हापूरातील कार्यकर्त्यांना पाहिलं की मला एकच कळतं…आपला नादच खुळा…आपला विषयच हार्ड…”
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही दसरा चौकात सभा का घेतली म्हणून टीका केली जात आहे. अशी टिका पुरोगामी विचार विसरलेले लोकच अशी करू शकतात. कोल्हापूरात कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात ऐतिहासिक दसरा चौकातून होते. कोल्हापूरचे लोक खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी करतात. आणि विचार सोडून गेलेल्या लोकांचं काय करायचं हेही तुम्हाला माहिती आहे.” असेही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “काही जण म्हणतात रोहितला अजित पवार यांची जागा घ्यायची आहे. पण मी कुणाची जागा घेण्यासाठी नाही तर प्रतिगामी विचाराला जागा दाखवायला कोल्हापूरात आलोय.आणि भाजपला त्यांची जागा देण्यासाठी 83 वर्षाचा युवक बाहेर पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटला म्हणता, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा केवळ पक्ष नाही विचार आहे. तुम्ही पक्ष फोडाल, कुटुंब फोडाल पण विचार कसे फोडणार?” असाही सवाल त्यांनी भाजपला केला.
आपल्या भाषणाच्या शेवटी बोलताना ते म्हणाले, “लोकशाहीची ताकद पैसे आणि दबावापेक्षा मोठी आहे. वटवृक्षाच्या पारंभ्याला वाटतं की माझ्यावर हा वटवृक्ष उभा आहे. पण वटवृक्षाची मुळं खोलवर आहेत त्यामुळे याचा नाद करायचा नाही” असेही ते म्हणाले.