पुणे / प्रतिनिधी :
जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेला तिसऱ्या स्थानावर पोचण्यासाठी देशातील प्रामुख्याने युवा वर्गाला बरोबर घेऊन एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुण्यात केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पद्मश्री डॉ. विखे पाटील अध्यासन आणि नॅशनल युवा को-ऑप सोसायटी यांच्या वतीने ‘सहकार क्षेत्रातील युवकांचा सहभाग’ या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेत ते बोलत होते. युवा सोसायटीचे अध्यक्ष राजेश पांडे, विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी नॅशनल युवा सोसायटीसारख्या संस्थांनी काम करावे. यासाठी त्यांना ‘नाबार्ड’ संस्थेशी जोडून देण्यात येईल. युवा क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि संघटनांनी युवकांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. केंद्र सरकारने विकास प्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा केल्या आहेत. नवे तंत्रज्ञान आणि नवे विचार आत्मसात करण्यात देशातील युवा वर्ग आघाडीवर आहे. त्यांच्या क्षमतेला प्रोत्साहन देऊन देश जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने वेगाने वाटचाल करीत आहे.