रहिवाशांचे आरोग्य धोक्यात
बेळगाव : बेनकनहळ्ळी ग्रा. पं. च्या कारभाराबाबत तक्रारी वाढल्या असून, नागरी समस्यांचे निवारण करण्यास पंचायत अपयशी ठरली आहे. कचऱ्याची उचल आणि गटार स्वच्छतेकडे कानाडोळा केल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अयोध्यानगर परिसरातील गटारी कित्येक वर्षापासून स्वच्छ करण्यात आल्या नसल्याने तुंबल्या आहेत. परिणामी नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नागरी समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी ग्रा. पं. ची आहे. मात्र ग्रा. पं. ने याकडे दुर्लक्ष केले आहे. बेनकनहळ्ळी ग्रा. पं. हद्दीमधील रहिवासी वसाहतींचा विस्तार झपाट्याने होत आहे. पण रहिवासी वसाहतींकडून केवळ घरपट्टी वसूल करण्याशिवाय कोणत्याच सुविधा व्यवस्थित पुरविल्या जात नाहीत. ग्रामपंचायत हद्दीमध्ये निर्माण झालेल्या नव्या वसाहतींमध्ये विविध सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. विशेषत: पाणी, रस्ते आणि स्वच्छता या नागरी सुविधा व्यवस्थित उपलब्ध व्हाव्यात, ही अपेक्षा नागरिकांची असते. पण या नागरी सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ अयोध्यानगरमधील रहिवाशांवर आली आहे. या परिसरातील गटारींची स्वच्छता केली नसल्याने कचऱ्याने तुंबल्या आहेत. परिणामी सांडपाण्याचा निचरा होण्यास अडचण भासत आहे. सांडपाणी साचून राहिल्याने विहिरींचे पाणी दूषित होत आहे. तसेच परिसरात दुर्गंधी पसरली आहे. डासांचा उपद्रव वाढल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे गटारी स्वच्छ करण्याबरोबरच ग्रा. पं. हद्दीमध्ये विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्याची उचल करून परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.