वार्ताहर /जांबोटी
ओलमणी येथील गटारीची साफसफाई करून त्यातील कचऱ्यांचे ढीग रस्त्यावरच टाकण्यात आल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून सदर कचऱ्याचे ढीग त्वरित हटवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. ओलमणी येथील अनेक गल्ल्यांतील गटारीमध्ये गाळ व कचरा साचल्यामुळे गटारी तुंबल्या आहेत. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा सुरळीत होत नसल्याने गटारीची स्वच्छता करावी, अशी मागणी ओलमणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे अनेकवेळा केली होती. त्याची दखल घेऊन जांबोटी ग्राम पंचायतच्यावतीने गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी गावातील सर्वच गटारींची साफसफाई करण्यात आली आहे. मात्र गटारीतील गाळ व कचरा काढून तो रस्त्यावरच टाकण्यात आल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेल्या कचऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. तसेच सदर कचरा व गाळ पुन्हा गटारीत साचून गटारी बुजण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वास्तविक पाहता गटारी साफ केल्यानंतर एक-दोन दिवसात ग्रामपंचायतीने सदर गाळ माती व कचऱ्याची उचल करून त्याची विल्हेवाट लावण्याची गरज होती. मात्र आठ-दहा दिवसांचा कालावधी उलटला तरी रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग उचलण्याकडे ग्राम पंचायतचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. तरी जांबोटी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून रस्त्यावरील कचऱ्याची त्वरित उचल करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.