वृत्तसंस्था/ दुबई
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने मंगळवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीसाठीची न्यूलँड्सची खेळपट्टी असमाधानकारक असल्याचा शेरा मारला आहे. सदर सामना पाच सत्रांत संपून भारताने यजमानांचा सात गडी राखून पराभव केल होता. हा सामना कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत लहान ठरला. या विजयामुळे भारताला दोन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवता आली.
आयसीसी खेळपट्टी आणि बाह्यमैदान देखरेख प्रक्रियेच्या अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या सामन्यात केवळ 642 चेंडू टाकता आले होते. न्यूलँड्समधील खेळपट्टीवर फलंदाजी करणे खूप कठीण होते. संपूर्ण सामन्यात चेंडू पटकन आणि काही वेळा चिंताजनक पद्धतीने उसळला, त्यामुळे फटके खेळणे कठीण झाले, असे सदर कसोटीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी आयसीसीला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. अनेक फलंदाजांच्या ग्लोव्हजवर चेंडू आदळले आणि मिळेल तशा उसळणाऱ्या चेंडूमुळे अनेक फलंदाज बाद झाले, असे ब्रॉड यांनी त्यात पुढे नमूद केले आहे.
यानंतर न्यूलँड्सला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. ज्या ठिकाणची खेळपट्टी आणि मैदान असमाधानकारक ठरविले जाते त्याला एक डिमेरिट पॉइंट दिला जातो. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाकडे याविऊद्ध दाद मागण्यासाठी 14 दिवसांचा अवधी आहे. एखादे ठिकाण सहा डिमेरिट पॉईंट्सपर्यंत पोहोचल्यास 12 महिन्यांसाठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करण्यापासून निलंबित केले जाते. तर 12 डिमेरिट पॉइंट्सच्या बाबतीत 24 महिन्यांच्या निलंबनाचा दंड ठोठावला जातो.
भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही कधी नव्हे अशा पद्धतीने बोलताना न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर टीका केली होती. ‘या सामन्यात काय झाले, खेळपट्टी कशी राहिली ते आम्ही पाहिले आहे. जोपर्यंत प्रत्येक जण भारतात तोंड बंद ठेवतो आणि भारतीय खेळपट्ट्यांविषयी जास्त बोलत नाही तोपर्यंत अशा खेळपट्ट्यांवर खेळायला माझी हरकत नाही, असे रोहितने सामन्यानंतर पत्रकारांना सांगितले होते. तथापि, या नवीन घडामोडीमुळे भारताच्या विजयाची तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी केल्ल्या शानदार कामगिरीची चमक कमी होणार नाही.