अद्यापही 700 कैदी दयनीय अवस्थेत बंद
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान सरकारने अटारी-वाघा सीमेवरून दोन भारतीय कैद्यांची सुटका करून त्यांना देशात परत पाठवले. दोन्ही कैद्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली आहे. पाकिस्तानातून सुटका झालेले दोन्ही तरुण चुकून पाकिस्तानात घुसले होते. तुरुंगातून सुटका झालेल्या एका कैद्याने उघड केल्यानुसार सुमारे 700 भारतीय कैदी पाकिस्तानमध्ये शिक्षा भोगत आहेत. तसेच या सर्वांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे सांगण्यात आले.
मध्यप्रदेशचा रहिवासी असलेला राजू नामक भारतीय पाच वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात पोहोचला होता. तसेच दुसरा कैदी गंब्रा राम हा राजस्थानमधील बारमेर जिल्हय़ातील आहे. आता पाकिस्तानच्या तुरुंगात सुमारे अडीच वर्षांची शिक्षा भोगून तो भारतात आला आहे. मुलीचा पाठलाग करताना गंब्रा राम पाकिस्तानात घुसला होता.