ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सांगलीच्या जत तालुक्यातील 40 दुष्काळी गावांवर दावा करण्याच्या कर्नाटक सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी म्हटले आहे. त्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह कर्नाटकात असलेली आमची गावं महाराष्ट्रात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री जे बोलले, ते समजून घ्या. या सीमा वादाच्या प्रश्नावर आपल्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानंतर अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळे सीमा भागातील आपल्या लोकांना मदत करण्याचे आपण ठरवले आहे. त्यांच्यासाठी आधीच्या आणि काही नवीन योजना आपण पोहोचवत आहोत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं असावं. मी मुख्यमंत्री असताना कर्नाटक सरकारसोबत बोलणी केली होती आणि जिथे पाणी उपलब्ध आहे. तिथून पाणी देण्याचा आपण निर्णय केला होता. म्हैसाळच्या सुधारित योजनेतही त्या गावांना घेण्याचा निर्णय तत्कालीन जनसंधारण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. आता त्या योजनेला आपण लवकरच मान्यता देणार आहोत.
अधिक वाचा : जेलमध्ये मंत्र्यांची मजा! सत्येंद्र जैन यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल
या गावांना अपेक्षित सर्व योजनांना केंद्र सरकारचा पैसा मिळाला असून, पैशाची कुठलीही अडचण नाही. त्यामुळे आपण एकही गाव महाराष्ट्रातून बाहेर जाऊ देणार नाही. उलट आम्ही सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह जी आमची गावं आहेत. ती आम्ही सर्व मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं आश्वासनही फडणवीसांनी दिलं.