भारताच्या पुढाकाराने आफ्रिकन युनियन बनले स्थायी सदस्य, संयुक्त घोषणापत्रावर सहमती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जी-20 शिखर परिषद शनिवारपासून दिल्लीत सुरू झाली आहे. जगातील अनेक महासत्ता सध्या भारतात आहेत. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकीच्या पहिल्या सत्रात एक मोठी घोषणा केल्यामुळे आतापासून जी-20 ला जी-21 असे संबोधले जाईल. भारताच्या पुढाकारामुळे आफ्रिकन युनियनला या गटाचे स्थायी सदस्यत्व मिळाले असून त्याचा थेट लाभ 55 देशांना होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाने जी-20 परिषदेची सुरूवात केली. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेले पहिले सत्र दुपारी 1.30 पर्यंत चालले. त्यानंतर दुसरे सत्र दुपारी 3 वाजता सुरू होऊन 5 वाजेपर्यंत चालले. यानंतर राष्ट्रपती भवनात डिनरचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जगातील महासत्तांचे दिल्लीत मोठे विचारमंथन सत्र होणार आहे. ‘भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जी-20’ शिखर परिषदेचे नेतृत्त्व दिमाखदारपणे करत भारताने आपली ताकद महासत्तांना दाखवून दिली आहे. जी-20 शिखर परिषदेचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात मोरोक्कोमधील भूकंपाबद्दल दु:ख व्यक्त केले.
नवी दिल्लीत सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेच्या पहिल्याच दिवशी संयुक्त घोषणापत्रावर सहमती झाली आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी दुसऱ्या सत्राच्या सुऊवातीला वक्ता या नात्याने ही माहिती दिली. त्यांनी सर्व सदस्य देशांच्या संमतीने घोषणापत्र जारी केले. शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधानांनी आफ्रिकन युनियनला जी-20 चा स्थायी सदस्य बनवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष म्हणून ते मंजूर करताच आफ्रिकन युनियनचे प्रमुख अझाली असौमानी यांनी उत्साहीपणे पंतप्रधान मोदींना आलिंगन दिले. भारताच्या प्रस्तावाला चीन आणि युरोपीय संघानेही पाठिंबा दिला होता.
सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणार
आपल्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधानांनी मोरोक्कोच्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांना श्र्रद्धांजली वाहिली. आम्ही मोरोक्कोच्या लोकांच्या दु:खाच्या वेळी त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांना शक्मय ती सर्व मदत करू, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनानंतर जगात विश्वासाचे संकट निर्माण झाले आहे. युद्धामुळे हे संकट अधिकच गडद झाले आहे. जेव्हा आपण कोरोनाला पराभूत करू शकतो, तेव्हा परस्पर चर्चेद्वारे विश्वासाच्या या संकटावरही मात करू शकतो. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची हीच वेळ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
मानवतेच्या कल्याणासाठी
आज आपण जिथे एकत्र आलो आहोत तिथून काही किलोमीटर अंतरावर एक अडीच हजार वर्ष जुना स्तंभ आहे. त्यावर प्राकृत भाषेत मानवतेचे कल्याण नेहमीच केले पाहिजे असा संदेश लिहिण्यात आलेला आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारत भूमीने संपूर्ण जगाला हा संदेश दिला होता. 21व्या शतकातील हा काळ संपूर्ण जगाला नवी दिशा देणार असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.
स्वागत सोहळ्याने जागतिक नेते भारावले
शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत मंडपम’मध्ये पोहोचलेल्या जागतिक राष्ट्रप्रमुखांचे स्वागत केले. त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना आलिंगन देत तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना दोन पावले पुढे जाऊन हस्तांदोलन करत परिषदस्थळी नेले. यादरम्यान येथे बांधलेल्या कोणार्क चक्राची माहितीही दिली.
चीन, रशिया, स्पेनचे राष्ट्राध्यक्ष अनुपस्थित
काही महत्त्वाच्या देशांचे राष्ट्रप्रमुख जी-20 च्या या अत्यंत महत्त्वाच्या शिखर परिषदेत सहभागी झाले नाहीत. यामध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा समावेश आहे. चीनने पंतप्रधानांना तर रशियाने परराष्ट्रमंत्र्यांना या परिषदेसाठी देशाचे प्रतिनिधी म्हणून पाठविले आहे. याशिवाय स्पेनचे राष्ट्रपती सांचेझ हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे या शिखर परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत.