मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री अनुभवी आहेत. जनतेचे कल्याण कशात आहे, ते त्यांना सांगण्याची गरज नाही. फक्त त्यांनी मनोमन एक मंत्र जपला पाहिजे, तो म्हणजे – उत्तिष्टत, जग्रत, प्राप्य वरान्निबोधत। अर्थात, उठा, जागे व्हा आणि प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा!
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये झालेला भाजप मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा ‘न भूतो, न भविष्यति’ ठरला, यात शंका नाही. डॉ. प्रमोद सावंत यांची मुख्यमंत्रीपदी व इतर आठ आमदारांची मंत्रिपदाची शपथ असा हा सोहळा होता आणि याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींपासून केंद्रातील अन्य तीन महत्त्वाचे मंत्री आणि भाजपप्रणित सात राज्यांचे मुख्यमंत्री या सोहळय़ाला उपस्थित राहिल्यामुळे हा शपथसोहळा ‘न भूतो, न भविष्यति’ ठरला, यात शंका नाही. त्याचबरोबर मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीत भाजपकडून निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्ती म्हणून वर्षाला तीन सिलिंडर मोफत मिळण्याची वचनपूर्तीची एप्रिल महिन्यापासून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा करून शुभस्य शीघ्रम याची प्रचिती आणून दिली आहे. याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत.
सात-आठ हजारांच्या उपस्थितीत केवळ पाच टक्केच इतर पक्षांचे लोक होते. भाजपमध्ये दोन महिला आमदार असूनही नारीशक्तीच्या सबलीकरणासाठी तत्पर असणाऱया भाजपकडून महिला आमदारांचा विचार झाला नाही. भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱया मगो आणि अपक्ष आमदारांचा पहिल्या टप्प्यात विचार झाला नाही, खारवी समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व दिले नाही, राज्य आर्थिकदृष्टय़ा दिवाळखोरीत असताना या सोहळय़ासाठी प्रचंड पैशांची उधळपट्टी करण्यात आली, लोकांच्या, पर्यटकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून राज्यातील जवळजवळ संपूर्ण पोलीस फौज या सोहळय़ासाठी तैनात करण्यात आली. थोडक्यात हा शपथसोहळा अविस्मरणीय असला तरी भाजप सुशासन देण्यापेक्षा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये अधिक आहे, अशी लगेच जाहीर टीकाही झाली. त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालेल का? यावरही गंभीरपणे चर्चा झाली पाहिजे, असे म्हणणारे जसे आहेत तसेच हा भाजपचा अंतर्गत मामला आहे, भाजपने काय करावे, हे भाजपच ठरविणार, इतरांची लुडबूड कशाला? असा जाब विचारणारेही महाभाग आहेत. त्यामुळे कोणी, काय करावे, काय बोलावे, हे ज्याचे त्याने ठरवावे, हेच खरे म्हणावे का?
एक गोष्ट खरी की, भाजप मंत्रीमंडळाच्या डबल इंजिनचा दुसरा अध्याय आता सुरू झाला आहे. या डबल इंजिनची ट्रबल इंजिन म्हणून विरोधकांनी टर उडविली होती. तसा प्रकार भविष्यकाळात घडू नये, याची दक्षता मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रीमंडळाला घ्यावी लागेल. नाहीतरी ज्या आठ जणांचा मंत्रीमंडळात समावेश झालेला आहे, ते बहुसंख्य पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे मुख्यमंत्री, मंत्री आहेत. धर्मनिरपेक्षपणे व ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ काम करण्याचे ध्येय त्यांनी मनी बाळगून त्याप्रमाणे आपल्या कार्यकर्तृत्वाने बहुजन समाजाला जवळ केले होते, त्यांना हिंदुत्वाच्या नावाखाली वेठीस धरता कामा नये. तर जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य म्हणजे सर्व जाती-धर्माच्या लोकांचे आहे, हे खरे करून दाखविले होते, त्यांचे अंगरक्षक, त्यांचे महत्त्वाचे मावळे आणि हेरगिरी करणारे जसे मराठा होते तसेच महार, मांग, रामोशी, कोळी, भट, ब्राह्मण आणि मुसलमान असे अठरापगड जातीचे लोक होते. या साऱयांच्या बळावरच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती, याचा विसर पडू देता कामा नये. कारण स्वामी समर्थ रामदास महाराजांनी राजा शिवछत्रपतींचे वर्णन करताना म्हटले होते, ‘शिवरायांचे आठवावे रुप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप, भूमंडळी’.
महाराजांचे कर्तृत्व आणि नेतृत्व अष्टपैलू होते. म्हणूनच ते देशातील ‘रयतेचा राजा’ म्हणून सर्वप्रथम सर्व धर्माच्या, पंथांच्या लोकांच्या आदरास पात्र ठरले.
सुदैवाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत, हे शिवाजी महाराजांना वंदनीय, पूजनीय मानणारे मुख्यमंत्री आहेत. शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपण जनता जनार्दनाचे निरपेक्षपणे कार्य करावे, असे लाखो-करोडों राजकारणी आणि समाजकारणी लोकांना वाटते व ते त्या दृष्टीने कार्यरतही असतात. त्याचा अनुभव लोक घेतही असतात. तसा चांगला अनुभव लोकांना देऊन प्रमोदजींनी लोकांना प्रमोदित करावे, असे नम्रपणे सूचवावेसे वाटते.
संपूर्ण देशाप्रमाणेच आपले राज्यही महागाई, जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर, रोज होणारी इंधन वाढ, बेरोजगारी, महिलांवरील जुलूम, जबरदस्ती यात आघाडीवर आहे पण आज सुरू करू, उद्या करू म्हणून गेली पाच वर्षे गटांगळय़ा खात असलेला खाण व्यवसाय, मयेवासियांच्या जमिनीचा प्रश्न, होऊ घातलेले प्रदुषणयुक्त प्रकल्प, मराठी राजभाषेचा प्रश्न, भूमिपुत्रांच्या जमिनीचा, घरांचा प्रश्न हे सारे ऐरणीवर आहेत. सामोपचाराने, तडजोडीने व विरोधकांनाही विश्वासात घेऊन या साऱया प्रश्नांची, समस्यांची, अडी-अडचणींची उकल करण्याचा प्रयत्न प्राधान्यक्रमाने झाला पाहिजे. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री अनुभवी आहेत. जनतेचे कल्याण कशात आहे, ते त्यांना सांगण्याची गरज नाही.
फक्त त्यांनी मनोमन एक मंत्र जपला पाहिजे, तो म्हणजे – उत्तिष्टत, जग्रत, प्राप्य वरान्निबोधत। अर्थात, उठा, जागे व्हा आणि प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा! म्हणून पुनश्च मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केलेले मुख्यमंत्री, या राज्याचे नृपती डॉ. सावंत यांना विनंती कराविशी वाटते की, ज्यापद्धतीने आपण शपथ सोहळा ‘न भूतो, न भविष्यति’ या पद्धतीने संपन्न केलात, त्याच मतीने आणि गतीने राज्याचा विकासरथ पुढे न्या. त्यासाठी तुम्हाला व तुमच्या सहकाऱयांना सद्बुद्धि प्राप्त होवो, ही शुभकामना.
– शंभू भाऊ बांदेकर