ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मागील 9 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला असून, जोपर्यंत मराठवाडय़ातील मराठय़ांना कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. याचदरम्यान, ओबीसी संघटनांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं. ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अन्यथा देशभर आंदोलन करू, असा इशारा ओबीसी महासंघाने दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यभरातील मराठा समाज एकवटल्याने राज्य सरकारने आता कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. मराठवाडय़ातील मराठय़ांना विदर्भाच्या धरतीवर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने समिती नेमली आहे. मात्र, ओबीसी संघटनांनी आक्रमक होत सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण देऊ नये, असे ओबीसी समाजाचे म्हणणे आहे. अशातच जालन्यामध्ये सुरू झालेल्या मराठा आरक्षणाच्या वादाला कुणबी विरुद्ध मराठा असं स्वरुप येऊ लागलं आहे.