पार्श्वभूमी
? 1998 च्या लोकसभा निवडणुकीनंतर नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाशी युती केली. ती पुढे 12 वर्षे टिकली. नंतर बिजू जनता दलाने युती तोडली आणि स्वतंत्ररित्या निवडणुका लढविण्यास प्रारंभ केला. त्यानंतर या दोन पक्षांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये कधीही युती झालेली नाही.
? गेली 25 वर्षे येथे नवीन पटनायक मुख्यमंत्री आहेत. त्यांना आणखी एक संधी मिळाल्यास ते ज्योती बसू यांचा 24 वर्षांचा विक्रम मोडू शकतात. येथे लोकसभा निवडणुकीसमवेत विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीतही याच पक्षाचा प्रभाव दिसून येतो. या पक्षाने गेली 10 वर्षे केंद्रातील भारतीय जनता पक्षप्रणित सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे.
? या पक्षाच्या सहकार्यामुळे केंद्र सरकारने तीन तलाक विधेयक, घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करणे, सवर्णांमधील गरीबांना आरक्षण इत्यादी अनेक विधेयके मार्गी लावली आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये आठ वेळा घटनादुरुस्ती विधेयके केंद्र सरकारने या पक्षाच्या साहाय्याने संमत करुन घेतली आहेत. यंदा या दोन पक्षांमध्ये युती होण्याची भाषा होत होती. मात्र, तसे झालेले दिसून येत नाही.
चार निवडणुकांची स्थिती
? गेल्या चार लोकसभा निवडणुकांमध्ये येथे टप्प्याटप्प्याने भारतीय जनता पक्षाच्या यशाचा आलेख चढताना दिसत आहे. 2004 मध्ये बिजू जनता दल आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होती. त्या युतीला 21 पैकी 18 जागांचे घवघवीत यश मिळाले होते. बिजदला 11 तर भारतीय जनता पक्षाला 7 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीनंतरही युती पुढे काहीकाळ टिकून राहिली होती.
? 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी बिजू जनता दलाने युती तोडली होती. तसेच तिसऱ्या आघाडीत प्रवेश केला होता. परिणामी, भारतीय जनता पक्षाने स्वतंत्ररित्या निवडणूक लढविली होती. बिजदला 14 जागा, तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 1 जागा मिळाली होती. हा पक्षही तिसऱ्या आघाडीत होता.
? 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर भारतात भारतीय जनता पक्षाची लाट असताना ओडीशात मात्र, या पक्षाला केवळ एक जागा मिळाली होती. बिजू जनता दलाने 20 जागांवर विजय मिळविला होता आणि काँग्रेसच्या हाती एकाही जागा लागली नव्हती. अशा प्रकारे बिजू जनता दलाने मोठे यश प्राप्त केले. तसेच नंतर केंद्र सरकारला संसदेत अनेक विधेयकांच्या संदर्भात साहाय्य केले होते.
? 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठी प्रगती करत, 21 पैकी 8 जागांवर विजय मिळवून राज्यात आपणच प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत, असे सिद्ध केले. पुन्हा एकदा काँग्रेसला एकही जागा हाती लागली नाही. विधानसभेतही भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळून काँग्रेसचे स्थान त्याने हिरावून घेतले. बिजदसमोर आव्हान उभे राहिले.
यंदा काय शक्य आहे…
? भारतीय जनता पक्षाच्या जागांमध्ये वाढ होईल, असे अनुमान अनेक मतदानपूर्व सर्वेक्षणांमधून काढण्यात आले आहे. त्यामुळे प्रमुख चुरस भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दलात राहण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या वाट्याला एखादी जागा येऊ शकते, असे अनेक राजकीय तज्ञांचे मत आहे.