रेल्वे अधिकाऱ्यांच्या घोषणा कोल्हापूरकरांच्या अंगवळणी
कोल्हापूर/ बाळासाहेब उबाळे
महिन्यातून एखादा तरी रेल्वेचा वरिष्ठ अधिकारी कोल्हापूरात येतो आणि रेल्वेचे प्रश्न सोडवण्याच्या घोषणा करुन जातो. गेल्या दोन वर्षात असे अनेक अधिकारी आले आणि गेले. पण कोल्हापूर रेल्वेचे प्रश्न प्रलंबितच आहेत. 5 मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मध्य रेल्वेच्या सरव्यस्थापक नरेश लालवाणी यांनी कोकण रेल्वेचा फेर सर्व्हे करण्याची घोषणा केली. यापूर्वीही अशा घोषणा केल्या असून त्याच त्या घोषणा किती वर्षे ऐकायच्या असा प्रश्न कोल्हापूरच्या जनतेतून उपस्थित केला जात आहे.
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री एक्सप्रेस कोरोनापासून बंद आहे. कोल्हापूर-बेंगलोर ही गाडीही कोल्हापूरातून बंद आहे. कोल्हापूर रेल्वे स्थानकावरील एक नंबर गेट भिंत बांधून रहदारी बंद केली आहे. अशा एक ना अनेक कोल्हापूर रेल्वेच्या समस्या आहेत. या समस्येबाबत कोल्हापूर रेल्वे प्रवासी संघटनांनी संबंधित रेल्वे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीकडे पाठपुरावा केला आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी कोल्हापूर दौऱ्यावर आले की त्यांच्याकडे निवेदने दिली जातात. त्यावेळी अधिकारी निवेदने घेऊन आश्वासित करतात. पण समस्यांची सोडवणूक न होता त्या तशाच राहतात. आताही 5 मे रोजी कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट देवून गेलेल्या मध्य रेल्वेच्या सरव्यस्थापक नरेश लालवाणी यांच्याकडे कोल्हापूर रेल्वेशी संबंधित कामांची यादी सादर करण्यात आली. लालवाणी यांनीही काम करण्याचे आश्वासन दिले. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे फेरसर्व्हेक्षण करणे हे लालवाणी यांनी दिलेले आश्वासन लक्षात राहणारे आहे. यापलीकडे त्यांच्या कोल्हापूर दौऱ्याचे फलित दिसून येत नाही. दिलेल्या आश्वानापैकी किमान एखादे तरी काम मार्गी लागल्यास रेल्वे अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचे फलित होईल. अन्यथा तोपर्यंत नवीन आश्वासनासाठी नवीन अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहेच.
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग प्रश्नोत्तरातच
कोल्हापूर- वैभववाडी या मार्गाला 2016 साली मंजुरी मिळाली आहे. यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उदघाटन त्या कामाचे उदघाटनही झाले.त्यानंतर कोल्हापूर-वैभववाडी मार्गाकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. रेल्वेचे अधिकारी कोल्हापूर दौऱ्यावर येतात. त्यावेळी हा प्रश्न उपस्थित केल्यास वरिष्ठ पातळीवर काम सुरु असल्याचे उत्तर मिळते. त्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदली होऊन नवीन अधिकारी आल्यावर पुन्हा तोच प्रश्न असतो. प्रश्नोत्तराचा हा खेळ गेली काही वर्षे सुरु आहे.
महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांची तक्रारीची दखलच नाही
कोल्हापूर -मुंबई मार्गावर महालक्ष्मी, सह्याद्री आणि कोयना एक्सप्रेस धावत होत्या. त्यापैकी सह्याद्री एक्सप्रेस कोरोनापासून बंद करण्यात आली आहे. कोयना एक्सप्रेस सकाळी धावते. तर महालक्ष्मी एक्सप्रेस रात्री धावते.कोल्हापूरसह सांगली,मिरज,सातारा जिल्ह्यातील प्रवाशांसाठी महालक्ष्मी एक्सप्रेस सोयीची असल्याने ही गाडी नेहमीच जाताना आणि येतानाही हाऊसफुल्ल असते. मात्र मुंबईहून येताना या प्रवाशांचे प्रचंड हाल येतात.ठाणे, कल्याण, पनवेल, पुण्याचे प्रवासी या गाडीच्या आरक्षित डब्यातही अतिक्रमण करतात. आरक्षण केलेल्या प्रवाशांनी रेल्वेच्या 132 क्रमांकावर तक्रार करुनही दखल घेतली जात नाही अशा तक्रारी प्रवाशातून केल्या जात आहेत.
दुहेरीकरण झाले तरच कोल्हापूर रेल्वेला गती
कोल्हापूर-मिरज मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे.पण कोल्हापूरातून अन्य मोठया शहरांशी रेल्वे कनेक्टीव्हिटी वाढवायची असेल तर कोल्हापूर-मिरज या मार्गाचे दुहेरीकरण होण्याची गरज आहे.