प्रतिनिधी, संग्राम काटकर
Olympic Men DinkarRao Shinde : राजर्षी शाहूंच्या काळात विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्यांच्या कारकिर्दीवर प्रकाश पडला होता. मात्र ऍटवर्पमध्ये (इंग्लंड) झालेल्या ऑलिम्पिककमधील कुस्ती स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवलेले दिनकरराव शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे त्यांचे फक्त कुस्तीतीलच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळात राजकीय व सामाजिक योगदान जनमाणसांसमोर आले नाही. त्यामुळेच शिंदे यांचे नात जावई मिलिंद यादव यांनी पुढाकार घेऊन कुस्तीपंढरी कोल्हापुरातील रत्न ठरलेल्या शिंदेच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणारे ‘पहिले ऑलिम्पिकवीर पैलवान दिनकरराव शिंदे’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याचे प्रकाशन गुरुवार 13 रोजी होत आहे. यानिमित्ताने शिंदे यांच्या कुस्ती व सामाजिक कार्यावर टाकलेला प्रकाशझोत…
ऑलिम्पिक आणि कुस्ती म्हटले की कराडचे खाशाबा जाधव व त्यांनी 1952 साली हेलसिंक ऑलिम्पिकमध्ये मिळवलेले कांस्य पदक आपल्या डोळ्यासमोर येते. खाशाबांनी भारताला पहिले पदक मिळवून दिले याचाही अभिमान वाटू लागतो. मात्र खाशाबा जाधव यांच्या आधी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात 1920 साली ऍटवर्पमध्ये झालेले ऑलिम्पिक गाजवले होते, याची फारशी माहिती उजेडात आली नाही. शिवाजी पेठ, उभा मारुती चौकनजिकच्या बावडेकर आखाडय़ातील लालमातीत मेहनत केलेले शिंदे यांचा ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेतील सहभाग आणि स्पर्धेत त्यांनी केलेली कामगिरी कुस्तीपंढरी कोल्हापूरच्या इतिहासाचे सोनेरी पान ठरली आहे.
1920 साली दस्तुरखुद्द राजर्षी शाहू महाराजांसमोर अटवर्प ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेस मल्ल पाठवण्यासंदर्भात पहिली चाचणी झाली होती. या चाचणीअंतर्गत झालेल्या कुस्तीत दिनकरराव शिंदे यांना बाबुराव पेंढारकर यांनी पराभूत केले. त्यामुळे पेंढारकरच पुण्यातील डेक्कन येथे ऑलिम्पिकसाठी होणाऱया भारतीय संघ निवड चाचणीस जाणार हे स्पष्ट झाले. मात्र पेंढारकरांनी शिंदे यांनाच चाचणीला पाठवावे अशी शिफारस केली. त्यानुसार शिंदे यांना डेक्कनमधील चाचणीस पाठवले गेले. यातून पेंढारकरांकडील मनाचा मोठेपणा, त्याग आणि खिलाडूवृत्ती पहायला मिळते. रोज पहाटे उठून शेकडो जोर-बैठका मारुन एक तयारीचे मल्ल झालेले शिंदे हेच ऑलिम्पिक खेळण्यास लायक होते, याची प्रचितीही आली होती. लंगडे वस्ताद या नावाने परिचत असलेले गणपतराव गायकवाड यांनीही शिंदे यांच्याकडून मेहनत किती घोटवून घेतली असेल हेही डोळ्यासमोर आपसुक येते. डेक्कनमधील भारतीय संघ निवड चाचणीत त्यांना 3 ऐवजी 6 कुस्ती कराव्या लागल्या. राजर्षी शाहूंच्या पट्टयाला ऑलिम्पिकला पाठवायचे नाही, असा कटही चाचणीस्थळी शिजला होता. पण शिंदे यांनी सहाही कुस्ती जिंकल्याने शिंदे यांनाच ऑलिंपिकला पाठवावे लागेल होते.
सर्व तयारीनिधी भारतीय संघासोबत अटवर्पला जाण्याचा दिवस उजाडला. समुद्रातील बोटीने शिंदे यांनी अटवर्पला प्रयाण केले. महिनाभर प्रवास करुन ते अटवर्पमध्ये पोहोचले. मात्र बोटीत खाण्या-पिण्यात थोडी कमतरता राहिल्याने त्यांना तब्येतीची तक्रार आली. पण तरीही आत्मशक्तीच्या जोरावर त्यांनी तब्येतीच्या तक्रारीवर मात केली. शिवाय अटवर्पमधील थंड वातावरणाशी ही जुळवून घेत शिंदे ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धा खेळण्यासाठी मॅटवर उतरले. त्यांनी एकुण 5 पैकी 3 कुस्ती जिंकल्या. त्यामुळे शिंदे यांना †ितसऱया क्रमांकासाठी झुंज देण्याची संधी मिळाली. या लढतीत मात्र शिंदे हरल्याने यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. दरम्यानच्या काळात शिंदे यांना ऑलिम्पिकमधील अमेरिकन प्रतिस्पर्धी मल्ल इनमन यांचे पत्र मिळाले. या पत्रात इनमन लिहितात, शिंदे तुम्हाला कुस्तीतील पॉईंट व नियम माहिती नसल्याने तुम्ही पराभूत झालात. अन्यथा स्पर्धेतील पदक हे तुम्हीच जिंकले असते. ऑलिम्पिकमध्ये तुम्ही केलेल्या खेळामुळे तुमच्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे, असेही इनमन यांनी पत्रात लिहिले आहे.
ऑलिम्पिकहून शिंदे हे कोल्हापुरात आल्यानंतर राजर्षी शाहूं महाराजांनी त्यांना लिपिक म्हणून नोकरी दिली. ही नोकरी करत शिंदे यांनी कुस्तीच्या वाढीसाठी प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर त्याकाळच्या शहरातील जुन्या बुधवार पेठेचे शिवाजी पेठे असे नामकरण शिंदे यांनीच केले. सध्या साऱया महाराष्ट्रात परिचयाचे असलेल्या शिवाजी तरुण मंडळाची स्थापनाही त्यांनीच केले. आज हेच शिवाजी तरुण मंडळ वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे, हे फक्त शिवाजी पेठच नव्हे तर साऱया कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद ठरले आहे. शिंदे यांनी शिवाजी पेठेच्या माध्यमातून सत्यशोधक, प्रजा परिषदेच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इतकेच नव्हे तर चळवळी जनमाणसांपर्यत पोहोचवून त्यात लोकांचा सहभाग वाढवण्याचे महत्वपूर्ण काम केले. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाच्या आठवणींना गुरुवारी पुस्तक प्रकाशनच्या रुपाने उजाळा मिळणार आहे.