व्यापक मोहीम उघडण्याची गरज; नागरिकांचीही जबादारी वाढली
कोल्हापूर / संतोष पाटील
शहरासह ग्रामीण भागात डेंग्यूसदृश्य तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. घरोघरी ‘व्हायरल’चे रुग्ण असतानाच आता सर्वसाधारण तापाच्या पाच रुग्णांपैकी एकास डेंग्यूसदृश्य आजार असल्याचे तपासणीत निष्पन्न होत आहे. महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने व्यापक स्वरुपात जनजागृतीसह ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पाऊस, मध्येच कडकडीत ऊन, रात्री गारठा असे पोषक वातावरण गोड्या पाण्यात एडीस डासांची पैदासीस कारण ठरले आहे. दुषित हवा, पाण्यामुळे साथींचा विळखा पडत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर या ऋतुसंक्रमण काळात डासांचा डंख नागरिकांच्या जीवावर उठला आहे. डेंग्यूसह साथींना अटकावास जिल्हा आरोग्य यंत्रणेला अपयश आल्याचे वास्तव आहे.
ग्रामीण भागात दुषित पाण्यापासून होणाऱ्या साथींनी डोके वर काढले आहे. शहरी भागात डेंग्यू व अन्य साथरुग्णांची संख्या वाढत आहे. जानेवारीपासून डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू आटोक्यात आल्याचा दावा केला जात असला तरी तीन महिन्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याची आकडेवारी सांगते. महापालिकेच्या आरोग्य विभागाने महिनाभर शहरात घर टू घर सर्वेक्षण केले. मात्र ते नावापुरतेच होते. घर पाहणी करुनच कर्मचारी परत गेल्याचे चित्र होते. यामध्ये आजारी व्यक्तीची माहिती, आजारी असल्यास कारणे, डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास तात्काळ औषधोपचार, डेंग्यूबाबत माहिती पत्रकांचे वाटप आदीचा सर्वेक्षणांर्तगत अभाव होता. प्रत्येक घरात डेंग्यूबाबत सर्वेक्षण नावालाच झाले. ग्रामीण भागातही डेंग्यूने उचल खाल्ली असून ग्रामपंचायत स्तरावर डास प्रतिबंधक मोहीम हाती घेण्याची गरज आहे.
एकदम जोराचा ताप, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांमागील भागात वेदना, स्नायू, सांध्यांमध्ये वेदना होतात. चव आणि भूक नष्ट होते, गोवरासारखे पुरळ, मळमळणे, उलट्या आदी डेंग्यू सदृश्य आजारांची लक्षणे आहेत. सर्वसामान्य वाटणाऱ्या या आजारांतच डेंग्यूचे मूळ आहे. डेंग्यूवर थेट औषध नाही. त्यामुळे प्रतिबंध हाच उपाय असल्याने काळजी घेण्याचा सल्ला तज्ञ देतात.
घराभोवतीच एडीस..!
एडीस इजिप्ती डास डेंग्यूस कारणीभूत आहे. मुख्यत्वे गोड्या पाण्यात व घरातच या डासांच्या अळ्या तयार होतात. डास आकाराने लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्याचा आकार पाच मिलीमीटर इतका असतो. डास चावल्यानंतर रुग्णांच्या शरीरात विषाणू तयार होण्यास आठ दिवस लागतात. डास दिवसा चावतो, घरांमध्ये आणि घराच्या आसपासच्या स्थितीत तो असतो. पाच दिवसापेक्षा अधिक अगदी वाटीभर पाण्यातही त्याची उत्पत्ती होते. जेथे पावसाचे पाणी साठत, साठवले जाते अशा अनेक जागांत या डासांची पैदास सहज होते. डेंग्यूबाबत प्रबोधन हाच उपाय आहे.
आर्थिक बोजा
डेंग्यू अथवा डेंग्यू सदृश्य आजारामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक चक्रच बिघडत आहे. घरात एकामागून दोन-तीन जणांना डेंग्यूची लागण होते. एकाचा हॉस्पिटल, संपूर्ण उपचाराचा खर्च किमान 50 हजार रुपये येतो. त्यानंतरही पुढील दोन, तीन महिने डेंग्यूचे परिणाम जाणवतात. अनुत्साह, अशक्तपणामुळे क्रयशक्ती कमी होते. डेंग्यूमुळे शारिरीक क्षमतेवर परिणाम होण्यासह आर्थिक बोजा पडत असल्याने सर्वसामान्य कुटुंबे हैराण झाली आहेत.