मध्यप्रदेशची राजधानी भोपाळपासून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावर बैरासिया लोकवस्ता आहे. या लोकवस्तीशी संलग्न सागौनी खुर्द नावाचे गाव असून या संपूर्ण गावात केवळ एकच मतदार आहे. तो या गावातील मंदिराचा पुजारी असून केवळ पूजा करण्यासाठी तो या गावात राहतो. त्याचे नाव महावीर दास असे असून केवळ त्याच्यासाठी येथे मतदानकेंद्राची व्यवस्था करावी लागते.
विशेष म्हणजे हे गाव 200 वर्षे जुने आहे. त्या काळात येथे राजस्थानातून दांगी परिवार रहावयास आला. मात्र, स्थानिक नागरीकांशी त्यांचा वाद झाला. या वादाचे पर्यवसान हिंसाचारात झाले आणि हे सारा दांगी परिवार त्यात मारला गेला. मात्र त्याचवेळी या परिवारातील एक गर्भवती महिला आपल्या माहेरी आली होती. केवळ ती वाचली. ती तिच्या माहेरीच बाळंत होऊन तिला पुत्र झाला, जो त्याच गावी वाढला. त्याने हे सागौनी खुर्द हे गाव वसविले. त्याला दोन पुत्र झाले. तेव्हापासून या गावाला संकटांनी घेरले, असे म्हणतात. त्याच्या दोन्ही पुत्रांना संतान प्राप्ती झाली नाही. तेव्हापासून हे गाव रिकामेच राहिले. जो या गावात राहील, त्याला संतान होणार नाही, अशी पक्की समजूत आजूबाजूच्या गावातील नागरीकांची झाल्याने ते या गावात रहातच नाहीत. या गावात एक जुने मंदीर आहे. त्यात पूजाआर्चा मात्र करावी लागते. त्यासाठी पुजारी लागतो. तो केवळ या गावात रहातो. तथापि, त्या पुजाऱयाचे कुटुंबही जवळच्या गावात राहते. गेली जवळपास 170 वर्षे हे गाव रिकामेच असल्याचे सांगण्यात येते. म्हणून येथे केवळ एक मतदार आहे आणि त्याच्यासाठी मतदानाची व्यवस्था करावी लागते.