पर्यावरण विभागाकडून स्वच्छता निरीक्षकांना विविध सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
शहर आणि उपनगरातील गटारी, नाले तुंबल्याने पावसाळय़ात पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी घरात शिरते. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी गटारी व नाले स्वच्छ करण्याचा आदेश मनपा पर्यावरण विभागाच्या वतीने स्वच्छता निरीक्षकांना बजावण्यात आला आहे. यंत्रोपकरणाचा उपयोग करून गटारी स्वच्छ करून समस्या उद्भवणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
बाजारपेठेतील गटारींवर फरशा आणि काँक्रिट घालण्यात आल्याने गटारी पूर्णपणे झाकल्या गेल्या आहेत. परिणामी गटारींची स्वच्छता करण्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महापालिकेच्या वतीने गटार स्वच्छता मोहीम राबविली जात नाही. कचऱयाची उचल करण्याबरोबरच नियमितपणे गटार स्वच्छता करण्याची जबाबदारी स्वच्छता कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. मात्र स्वच्छता कंत्राटदाराकडून गटारीची स्वच्छता केली जात नाही. केवळ कचऱयाची उचल करून नाममात्र गटारींची स्वच्छता केली जाते. जर नागरिकांनी तक्रार केल्यासच गटारींची स्वच्छता करून कचरा काढला जातो. पण आपली जबाबदारी आहे, या उद्देशाने गटारींची स्वच्छता केली जात नसल्याने पावसाळय़ात पाण्याचा निचरा होत नाही. सध्यादेखील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गटारी स्वच्छ करण्यात याव्यात, अशी मागणी सातत्याने केली जाते. पण मनपाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही.
मात्र सध्या पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाले आणि गटारी स्वच्छ करण्याची सूचना महापालिका आयुक्त रूदेश घाळी यांनी पर्यावरण विभागाच्या अभियंत्यांना केली आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरातील गटारी व नाल्यांची स्वच्छता करण्याचा आदेश पर्यावरण सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांनी सर्व स्वच्छता निरीक्षकांना बजावला आहे. स्वच्छतेची कामे करण्यासाठी महापालिकेने विविध यंत्रोपकरणे खरेदी केली आहेत. या यंत्रोपकरणाचा वापर करून नाले आणि गटारी पावसाळय़ापूर्वी स्वच्छ कराव्यात, अशी सूचना अभियंत्यांनी केली आहे. पावसाळय़ात नागरिकांना कोणत्याच अडचणी भासू नयेत याची दक्षता घ्या. तसेच ज्या ठिकाणी गटारीवर काँक्रिट किंवा फरशा घातल्या आहेत त्या संबंधित मालमत्ताधारकांनी हटविणे बंधनकारक असून, त्या ठिकाणच्या गटारी मनपाच्या कर्मचाऱयांनी स्वच्छ कराव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे.